अ‍ॅपशहर

जिल्हाधिकाऱ्यांनी ४ पाकिस्तानी नागरिकांना दिलं भारतीय नागरिकत्वाचं प्रमाणपत्र

पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि बऱ्याच कालावधीपासून राहणाऱ्या ४ पाकिस्तानी नागरिकांना पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी भारतीय नागरिकत्व दिलं. याशिवाय आणखी २५ जणांचा भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 23 Oct 2020, 3:11 am
म. टा. प्रतिनिधी, पुणेः पाकिस्तानमधून येऊन ‘लाँग टर्म व्हिसा’वर राहणाऱ्या चार पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले असल्याने त्यांचे भारतात कायमचे राहण्याचे स्वप्न साकार झाले आहे. याशिवाय १७ पाकिस्तानी, एक बांगलादेशी आणि अन्य देशांमधील सात अशा २५ परदेशी नागरिकांना शपथ देण्यात आली असून, कागदपत्रांचे सोपस्कार पार पडल्यावर या नागरिकांचाही भारतीय नागरिकत्त्व मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते चार पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajesh deshmukh pune collector
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ४ पाकिस्तानी नागरिकांना दिले भारतीय नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र


नागरिकत्त्व देण्यापूर्वी संबंधित नागरिकांना सात वर्षे भारतात राहावे लागते; तसेच नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी १२ महिने मूळ देशाशी संपर्क ठेवावा लागत नाही. या नागरिकांची माहिती गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून घेण्यात आलेली असते. त्यानंतरच त्यांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात येते. त्यानुसार रितिक जेसोमल मखिजा, अनमोल भगोमल मखिजा, त्याची बहिण प्रियांका आणि रमेश घनशामदास या चौघांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले आहे. हे नागरिक सध्या ‘लाँग टर्म व्हिसा’ घेऊन राहत होते. प्रत्येक वेळी त्यांना पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागत होते. आता त्यांची या त्रासातून कायमची सुटका झाली आहे.

भारतीय नागरिकत्त्व प्रमाणपत्र देण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे पालन करण्याबाबतची शपथ परदेशी नागरिकांना देण्यात येत असते. त्यानुसार १७ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाला शपथ देण्यात आली. या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भारतीय नागरिकत्त्व देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. अमेरिका, केनिया आणि फिलिपिन्स या देशांतील सात नागरिकांनाही शपथ देण्यात आली. या नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

दरेकरांनी खडसेंचे पाय धरायला हवे होते; 'या' मंत्र्याने केला पलटवार

दरेकरांनी खडसेंचे पाय धरायला हवे होते; 'या' मंत्र्याने केला पलटवार

भारतीय नागरिकत्त्व दिलेल्या चार पाकिस्तानी नागरिकांच्या कुटुंबांतील अन्य सदस्यांनी यापूर्वी भारतीय नागरिकत्त्व घेतले आहे. आता या नागरिकांचेही भारतीय नागरिकत्त्व मिळविण्याचे स्वप्न साकार झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज