म. टा. प्रतिनिधी, पुणे
हत्तींचे जग वेगळे असते. महाकाय दिसणाऱ्या या प्राण्याचे हृदय मात्र खूप संवेदनशील. त्यांना माणसाच्या भावना कळतात आणि हत्तींबरोबर मैत्री झाल्यावर ते आपल्याशी संवाद साधतात. एकदा हत्तीशी मैत्री झाल्यावर तो कधीच तुम्हाला सोडून जात नाही. हत्तीला आज माणसाची गरज आहे. बुद्धिमान, आक्रमक आणि तितक्याच हळव्या असलेल्या या प्राण्याच्या संवर्धनासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन वन्यजीव छायाचित्रकार आनंद शिंदे यांनी केले.
निमित्त होते, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने आणि ‘बीएमसीसी’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘मटा संवाद’ कार्यक्रमाचे. हत्तींशी अनोख्या शैलीत संवाद साधणाऱ्या आनंद शिंदे यांनी शेअर केलेल्या ‘गज’गोष्टींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
करिअर म्हणून शिंदे यांनी पत्रकारिता निवडली; पण त्यांची केरळला झालेली बदली आयुष्याला कलाटणी देऊन गेली. शिंदे यांना फोटोग्राफी आणि निसर्ग भटकंतीची आवड होती. तिथे नकळत ते वन्यजीव छायाचित्रणाकडे ओढले गेले. या कामादरम्यान त्यांचा हत्तींशी जवळून संबंध आला. या काळात हत्तींच्या सहवासात आलेले अनुभव शिंदे यांनी या वेळी सचित्र व्याख्यानाद्वारे उलगडले.
हत्तींबरोबर मोकळ्या वेळेत चालणे, कळपाच्या पाठीमागे फिरणे, त्यांची संवादाची पद्धत, त्यांच्या देहबोलीचा मी अभ्यास करीत गेलो. यातूनच हत्तींचा राग, वर्तन कळू लागले आणि माझे कुतूहल वाढत गेले. आईपासून दुरावलेले, कळपापासून चुकलेले तर काही अपघातामुळे जखमी झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हत्तींना हाताळण्याचा अनुभव घेतला. सहवासात आलेल्या प्रत्येक हत्तीमध्ये मला वेगळेपणा जाणवला, प्रत्येकाने माझ्यावर मनापासून प्रेम केले आणि लळाही लावला, असे सांगून शिंदे यांनी गंगा, कृष्णा, राजा, राणा अशा वेगवेगळ्या हत्तींच्या आठवणी जागवल्या.
ओघवत्या आणि सहज सोप्या शब्दांत विषय मांडण्याच्या शैलीमुळे शिंदे यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. हत्तींना कशा पद्धतीने हाताळावे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘ट्रंक कॉल : द वाइल्ड लाइफ फाउंडेशन’ या संस्थेची माहितीही त्यांनी या वेळी सांगितली.
हत्तींशी संवाद साधल्यानंतर निसर्गाची अद्भुत किमया अनुभवता येते. एकदा त्याच्याशी मैत्री झाल्यावर तो कधीही तुम्हाला सोडून जात नाही. संकटात कधीही तुम्हाला एकटे टाकत नाही. निसर्ग आणि माणसाचे नाते किती अतूट आहे हे हत्तींचे भावविश्व अनुभवल्यानंतर समजते. हत्तींशी संवाद साधण्यासाठी भाषा नव्हे; तर भावनांची गरज आहे. आपल्या देहबोलीतून त्यांना भावना कळतात. आज हत्तीला माणसाची गरज आहे. निसर्गातला तो महत्त्वाचा घटक असून अनेक लहान-मोठे वन्यजीव त्याच्यावर अवलंबून आहेत. हत्ती निसर्गातून नाहीसा झाला; तर निसर्गचक्र कोलमडेल. आपणच त्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.
हत्तींचे जग वेगळे असते. महाकाय दिसणाऱ्या या प्राण्याचे हृदय मात्र खूप संवेदनशील. त्यांना माणसाच्या भावना कळतात आणि हत्तींबरोबर मैत्री झाल्यावर ते आपल्याशी संवाद साधतात. एकदा हत्तीशी मैत्री झाल्यावर तो कधीच तुम्हाला सोडून जात नाही. हत्तीला आज माणसाची गरज आहे. बुद्धिमान, आक्रमक आणि तितक्याच हळव्या असलेल्या या प्राण्याच्या संवर्धनासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन वन्यजीव छायाचित्रकार आनंद शिंदे यांनी केले.
निमित्त होते, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने आणि ‘बीएमसीसी’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘मटा संवाद’ कार्यक्रमाचे. हत्तींशी अनोख्या शैलीत संवाद साधणाऱ्या आनंद शिंदे यांनी शेअर केलेल्या ‘गज’गोष्टींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
करिअर म्हणून शिंदे यांनी पत्रकारिता निवडली; पण त्यांची केरळला झालेली बदली आयुष्याला कलाटणी देऊन गेली. शिंदे यांना फोटोग्राफी आणि निसर्ग भटकंतीची आवड होती. तिथे नकळत ते वन्यजीव छायाचित्रणाकडे ओढले गेले. या कामादरम्यान त्यांचा हत्तींशी जवळून संबंध आला. या काळात हत्तींच्या सहवासात आलेले अनुभव शिंदे यांनी या वेळी सचित्र व्याख्यानाद्वारे उलगडले.
हत्तींबरोबर मोकळ्या वेळेत चालणे, कळपाच्या पाठीमागे फिरणे, त्यांची संवादाची पद्धत, त्यांच्या देहबोलीचा मी अभ्यास करीत गेलो. यातूनच हत्तींचा राग, वर्तन कळू लागले आणि माझे कुतूहल वाढत गेले. आईपासून दुरावलेले, कळपापासून चुकलेले तर काही अपघातामुळे जखमी झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हत्तींना हाताळण्याचा अनुभव घेतला. सहवासात आलेल्या प्रत्येक हत्तीमध्ये मला वेगळेपणा जाणवला, प्रत्येकाने माझ्यावर मनापासून प्रेम केले आणि लळाही लावला, असे सांगून शिंदे यांनी गंगा, कृष्णा, राजा, राणा अशा वेगवेगळ्या हत्तींच्या आठवणी जागवल्या.
ओघवत्या आणि सहज सोप्या शब्दांत विषय मांडण्याच्या शैलीमुळे शिंदे यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. हत्तींना कशा पद्धतीने हाताळावे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘ट्रंक कॉल : द वाइल्ड लाइफ फाउंडेशन’ या संस्थेची माहितीही त्यांनी या वेळी सांगितली.
हत्तींशी संवाद साधल्यानंतर निसर्गाची अद्भुत किमया अनुभवता येते. एकदा त्याच्याशी मैत्री झाल्यावर तो कधीही तुम्हाला सोडून जात नाही. संकटात कधीही तुम्हाला एकटे टाकत नाही. निसर्ग आणि माणसाचे नाते किती अतूट आहे हे हत्तींचे भावविश्व अनुभवल्यानंतर समजते. हत्तींशी संवाद साधण्यासाठी भाषा नव्हे; तर भावनांची गरज आहे. आपल्या देहबोलीतून त्यांना भावना कळतात. आज हत्तीला माणसाची गरज आहे. निसर्गातला तो महत्त्वाचा घटक असून अनेक लहान-मोठे वन्यजीव त्याच्यावर अवलंबून आहेत. हत्ती निसर्गातून नाहीसा झाला; तर निसर्गचक्र कोलमडेल. आपणच त्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.