म. टा. वृत्तसेवा, जुन्नर
हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवजाळी येथे गरीब ठाकर समाजातील चार घरे आगीच्या भक्षस्थानी पडली. १० डिसेंबरला घडली. आगीने पीडित कुटुंबामधील सयाजी मधे यांच्या घरातील छकुली नावाच्या मुलीचे १२ डिसेंबरला लग्न होते. लग्नासाठी आणलेला बस्ता, किराणा, तसेच इतर साहित्य आणि दागिने आगीत भस्मसात झाले. या कुटुंबाला अतुल बेनके मित्र परिवाराने मदतीचा हात दिला आहे.
सुरजभाऊ वाजगे यांना आगीती माहिती कळताच त्यांनी मित्रपरिवारासह या कुटुंबाच्या घरांतील साहित्य आगीतून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घरातील दुचाकी बाहेर काढण्यात त्यांना यश आले. परंतु, घरे पाचटाची असल्याने ती पूर्णत भस्मसात झाली. छकुलीच्या लग्न समारंभावर आलेले संकट दूर करण्याचा विचार सूरज वाजगे यांनी आमदार अतुल बेनके यांच्या कानावर घातला. तेव्हा संपूर्ण खर्च करण्यासाठी बेनके यांनी तात्काळ मान्यता दिली.
आगीच्या घटनेत गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे यांची घरे भस्मसात झाली. गंगाधर मुळे, गणेश पाटील, प्रदीप पाटील, नयना थोरात, रामनाथ भुतांबरे, भागेश्वर पाटील व देवजाळी ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सरपंच वंदना राजगुरू यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संसारोपयोगी साहित्याची मदत करणार असल्याचे सांगितले. शिवदास विधाटे व राजूशेठ देवकर यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली.