अ‍ॅपशहर

प्याले वाढतच आहेत

एकच प्यालाने प्याले कमी व्हायला पाहिजे होते, पण प्याले वाढत आहेत. नटसम्राटमुळे घरातील वातावरण चांगले व्हायला पाहिजे होते; पण वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे,’ अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी चौफेर फटकेबाजी केली.

Maharashtra Times 24 Apr 2017, 3:00 am
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची चौफेर फटकेबाजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम haribhau bagade speech at natya sammelan
प्याले वाढतच आहेत


उस्मानाबाद : ‘नाटकात करमणूक कमी असते. करमणुकीसाठी वेगळे मार्ग असतात. नाटक हे प्रबोधन, शिक्षणाचे माध्यम आहे. ज्यांना प्रबोधन करून घ्यायचे ते नाटकाला येतात. एकच प्यालाने प्याले कमी व्हायला पाहिजे होते, पण प्याले वाढत आहेत. नटसम्राटमुळे घरातील वातावरण चांगले व्हायला पाहिजे होते; पण वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे,’ अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी चौफेर फटकेबाजी केली.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे उस्मानाबाद येथे आयोजित ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले. त्या वेळी बागडे बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, खासदार रवींद्र गायकवाड, स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, ओमराजे निंबाळकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, धनंजय शिंगाडे उपस्थित होते.

‘माझ्या ६२ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच गर्दी पाहिली. प्रथमच लेखकाने लिहिलेले संवाद न बोलता, मी माझे विचार मांडू शकलो. रसिकांनी कला जिवंत ठेवली आहे,’ अशी भावना सावरकर यांनी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष ठाकूर यांनी भावपूर्ण भाषणाने नागरिकांची मने जिंकली. ‘काही उणिवा राहिल्या असतील तर माफ करा,’ अशी दिलगिरी वारंवार व्यक्त करत त्यांनी आपल्या भाषणाची छाप सोडली.

गायकवाडांचे जाहीर दर्शन

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर प्रसिद्धीच्या झोत्यात आलेले खासदार रवींद्र गायकवाड हे उस्मानाबाद येथे आयोजित नाट्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. रंगमंचावरील पहिल्या रांगेत महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गायकवाड यांनी दुपारी एका नाटकाचाही आस्वाद घेतला. ते येणार म्हणून नाटकाला दोन तास विलंब झाला. एअर इंडियाच्या प्रकारानंतर नाट्य संमेलनाच्या निमित्ताने खासदार गायकवाड यांचे उस्मानाबादकरांना पहिल्यांदाच जाहीर दर्शन झाले. भाषण करण्याचे मात्र त्यांनी टाळले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज