हिराबाई चिपळूणकर यांना
सत्यशोधक समता पुरस्कार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनादिनास २४ सप्टेंबर रोजी १४५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई चिपळूणकर यांना पहिल्या सत्यशोधक समता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. बाबा आढाव व सरचिटणीस अॅड. शारदा वाडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्याला यंदा १४५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून, या वर्षापासून फुले विचारांचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनादिनी सोमवारी, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. गौरवचिन्ह, शाल व १० हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मोरे यांना पुरस्कार
वंचितांसाठी काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना देण्यात येणारा 'कॉ. अशोक मनोहर युवा ऊर्जा पुरस्कार', 'जन आरोग्य अभियान'चे डॉ. अभिजित मोरे यांना देण्यात येत आहे. मानचिन्ह, सन्मानपत्र व १० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढील बुधवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगर येथील श्रमिक भवनात डॉ. हमीद दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. रुपेश पाटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. खासगी वैद्यकीय सेवेचे प्रमाणीकरण करण्यासाठी सरकारने 'महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट' हा कायदा आणावा व त्यात रुग्णांचे हक्क, हितसंबंध राखणाऱ्या तरतुदी कराव्या, यासाठीच्या चळवळीत ते सातत्याने पुढाकार घेत आले आहेत. सरकारी व खासगी आरोग्य व्यवस्थेपुढे हतबल रुग्णांच्या मानवी हक्कांसाठी आवाज उठवणे, आंदोलन संघटित करून हा कायदा आणण्यासाठी दबाव निर्माण करणे, या कायद्याचा पर्यायी मसुदा मांडणे असे निरनिराळे मार्ग वापरण्यात डॉ. मोरे यांचा पुढाकार आहे.
स्वच्छता अभियान
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालय व अंगणवाडी खानापूरतर्फे 'स्वच्छता अभियान' राबविण्यात आले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य भागवत सपकाळ, सरपंच शरद जावळकर, पोलिस पाटील गणेश सपकाळ, दत्तात्रय जावळकर (तंटामुक्त अध्यक्ष), पर्यवेक्षक विजयकुमार शेवाळे, ज्येष्ठ शिक्षक शशिकांत जाधव; तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून 'स्वच्छ गाव सुंदर गाव'चा नारा देऊन परिसरात जागृती निर्माण केली. श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर परिसरात स्वच्छता केली.
पाठांतर स्पर्धेचे आयोजन
श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत नुकतीच गणेशोत्सवानिमित पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. कार्तिकी होगे, सार्थक भुजबळ, आशितोष खंडागळे, अनिशा शिंदे, रेवती तापकीर, अथर्व गवांदे, भावार्थ धाडगे, सुवेद बकाल, ज्ञानेश्वरी देशमुख, श्रेया कदम, वैष्णवी बागल, वैष्णवी आव्हाड, प्रणव शिंदे यांनी स्पर्धेत यश मिळविले. मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. राहुल चव्हाण यांनी स्पर्धाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.