अ‍ॅपशहर

ऐतिहासिक महत्त्वाचा विंचूरकर वाडा

ब्रिटिश राजवटीत भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रसिद्धी होती. ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या विरोधात 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशा जळजळीत अग्रलेखांनी धाबे दणाणलेले असायचे.

Maharashtra Times 15 Sep 2018, 3:29 am
जयवंत मठकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम historical significance vinchurkar wada
ऐतिहासिक महत्त्वाचा विंचूरकर वाडा


ब्रिटिश राजवटीत भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रसिद्धी होती. ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या विरोधात 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशा जळजळीत अग्रलेखांनी धाबे दणाणलेले असायचे. स्वातंत्र्याची आस्था सखोल व व्यापक व्हावी, यासाठी असंतोषाला रचनात्मक संस्कारात्मक वळण देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पुण्यात सदाशिव पेठेत सरदार विंचूरकर वाड्यात सन १८९४ मध्ये त्यांनी पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. त्या वेळी केसरीचे प्रकाशन जवळजवळ सहा महिने विंचूरकर वाड्यातूनच होत होते.

स्वातंत्र्य आंदोलनात गायकवाड वाड्याएवढेच महत्त्व सरदार विंचूरकर वाड्याला होते. स्वातंत्र्यासाठी लोकजागरण, लोकशिक्षण, संघटन यासाठी टिळकांनी जे जे कार्य केले, त्या कार्याची पायभरणी विंचूरकर वाड्यातून झाली आहे. सन १८९१ नंतर जवळजवळ १४ वर्षे त्यांचे वास्तव्य या विंचूरकर वाड्यात होते. या वाड्यातून कायद्याच्या शिकवणीचे वर्ग टिळक घेत असत. त्यामुळे या प्रथम प्रस्थापित गणेशोत्सवाला 'लॉ क्लासचा गणपती' असे म्हटले जात असे. जून १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यातील ऐतिहासिक भेट या विंचूरकर वाड्यात झाली. सुरुवातीला 'केसरी', 'मराठा' या नियतकालिकांचे कार्यालय याच विंचूरकर वाड्यात होते. या प्रथम प्रस्थापित गणेशोत्सवाच्या शताब्दीवर्षापासून 'दै. केसरी'चे संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या अध्यक्षतेखाली निरनिराळ्या उपक्रमांनी या गणेशात्सवाचे कार्य चालते. या वाड्यात महात्मा गांधी प्रणित सर्वोदयाचे व खादी ग्रामोद्योगाची कार्यालये आहेत. सन १९६१ साली पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात जो जलप्रलय निर्माण झाला, त्या वेळी कोकण गांधी पू. अप्पासाहेब पटवर्धन, ज्यांना 'सफाईचे जनक' म्हणून मान्यता आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सफाईचे कार्य विंचूरकर वाड्यातून झाले. हा विंचूरकर वाडा महात्मा गांधी प्रणित रचनात्मक कार्य, साने गुरूजी कथामाला, दारुबंदी व खादी ग्रामोद्यागाच्या कार्यासाठी प्रसिद्धी पावला. या सर्व कार्याची मूळ बैठक या वाड्यातील प्रथम प्रस्थापित गणेशोत्सव ही होती. सन १९७४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन, सन १९७५ च्या आणीबाणी विरोधी संघर्षाचे कार्यालय विंचूरकर वाड्यातच होते.

गणेशोत्सवाच्या व्यवस्थापनात कार्याध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार, उत्सवप्रमुख म्हणून सर्वश्री जयवंत मठकर , शीलाताई गजानन बैसास, रविंद्र पाठारे, किरण राहुरकर, रोहित टिळक, महापौर मुक्ता टिळक यांची भागीदारी उपयुक्त अशी आहे. अशा या सरदार विंचूरकर वाड्यात प्रसिद्ध वास्तुतंत्रज्ञ शशांक परांजपे यांचा भव्य व्यावसायिक वास्तू प्रकल्प आहे. त्यांनी या वाड्यातील प्रथम गणेशोत्सवाच्या इतिहासाचे जतन केले आहे. प्रशस्त सभागृह, गणपती व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची उत्तम चित्रप्रदर्शनी येथे आहे. या लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती मंडळाचे हे १२५ वे वर्ष आहे. त्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१५ सप्टेंबर) 'सुखी जीवनाचा मूलमंत्र : शाकाहार आणि व्यसनमुक्ती' या विषयावर डॉ. कल्याण गंगवाल, मंगळवारी (दि. १८) 'प्राकृतिक चिकित्साद्वारे ताणतणाव मुक्ती' या विषयावर डॉ. जयाताई पेंडसे, शुक्रवारी (दि. २१) 'लोकमान्य ते महात्मा' या विषयावर प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ-नियोजन वनमंत्री व राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व दीपक केसरकर, पालकमंत्री गिरीश बापट यांना शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. पुण्यातील प्रथम सात मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांचा डॉ. दीपक टिळक यांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

(लेखक लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज