अ‍ॅपशहर

हॉस्पिटल फक्त नावापुरतेच

हॉस्पिटलसाठी पुरेसे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारीवर्ग नसतानाही येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातील स्वातंत्र्यसेनानी गंगाराम कर्णे हॉस्पिटलचे घाईगडबडीत उद्घाटन केल्याचे समोर आले आहे

Maharashtra Times 18 Nov 2016, 3:40 am
नव्या कर्णे हॉस्पिटलमध्ये मूलभूत गोष्टीच नसल्याने कर्मचारी, पेशंटची गैरसोय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hospital inaugerated for the sake of election
हॉस्पिटल फक्त नावापुरतेच


म. टा. प्रतिनिधी, येरवडा

हॉस्पिटलसाठी पुरेसे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारीवर्ग नसतानाही येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातील स्वातंत्र्यसेनानी गंगाराम कर्णे हॉस्पिटलचे घाईगडबडीत उद्घाटन केल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटलला अद्याप पाण्याचे कनेक्शन जोडले नसल्याने डॉक्टर आणि उपचारांसाठी येणाऱ्या पेशंटना पिण्याच्या पाण्यासाठी आणि स्वच्छतागृहाचा वापर करण्यात अडचण होते. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन ठेवण्यासाठी फ्रीज नसल्यामुळे परिसरातील लहान मुलांना लसीकरणसुद्धा करता येत नाही. त्यामुळे केवळ पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना विकासकामे दाखविण्यासाठी हॉस्पिटलचे उद्घाटन केल्याचे निष्पन्न होत आहे.

येरवड्यातील प्रभाग क्रमांक सतराचे विद्यमान नगरसेवक बापूराव कर्णे (गुरुजी) यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड रस्त्यावर शास्त्रीनगर चौकात पालिकेच्या ताब्यात असलेल्या आरक्षित जागेवरील दुमजली इमारतीचे नूतनीकरण करून नवीन हॉस्पिटल बनविण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या, स्वातंत्र्यसेनानी गंगाराम कर्णे हॉस्पिटलचे गेल्या महिन्यात १५ ऑक्टोबर रोजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. हॉस्पिटल सुरू होऊन महिन्याभराचा कालावधी उलटून गेला आहे. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलची पाहणी केली असता अद्याप हॉस्पिटलच्या अनेक मूलभूत गरजाही पूर्ण झाल्या नसल्याची माहिती पुढे आली.

हॉस्पिटलमध्ये सध्या एक डॉक्टर, नर्स, औषधवाला आणि केसपेपर बनवण्यासाठी एक कर्मचारी एवढे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सध्या केवळ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला आहे; मात्र पालिका प्रशासनाकडून हॉस्पिटलला फ्रीज देण्यात आलेला नाही. त्यामुळे थंड तापमानात ठेवावी लागणारी इंजेक्शन्स तेथे ठेवता येत नाहीत. त्यामुळे स्थानिक परिसरातील मुलांना लसीकरण करता येत नाही. परिणामी पालकांना आपल्या मुलांना दूर अंतरावरच्या पालिकेच्या दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे मोठा गाजावाजा करून उभारलेले हे हॉस्पिटल केवळ दवाखान्यापुरते मर्यादित आहे.

‘अद्याप हॉस्पिटलसाठी पाण्याचे कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. तसेच स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची मोठी अडचण होते. त्यामुळे पाण्याचे टँकर मागवावे लागतात,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
.............

पालिकेच्या ताब्यातील दुमजली इमारत धूळ खात पडली असल्याने नवीन हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. निधीची कमतरता असल्याने यंत्रसामग्री खरेदी करता आली नाही. पुढील वर्षी निधीची तरतूद केल्यानंतर आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यात येईल. तसेच पुढील वर्षी ‘टीबी’चे केंद्र सुरू करून उपचार केले जातील. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच आणखी डॉक्टरांच्या नियुक्त्या केल्या जातील.
- बापूराव कर्णे (गुरुजी), नगरसेवक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज