म. टा. प्रतिनिधी, पुणे मानवी तस्करी रोखण्याचे मोठे आवाहन जगभरातील तपास यंत्रणांसमोर उभे असतानाच, वेश्या व्यवसायासाठी मानवी तस्करी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. देशातील २०१७ मधील गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे. 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो'च्या अहवालानुसार, देशातील एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०१७ मध्ये मानवी तस्करीचे १,२७५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात ४७४ एवढे नोंदविण्यात आले आहेत. जबरदस्तीने नोकर म्हणून वागवणे, वेश्या व्यवसाय, कोंडून अत्याचार, जबरदस्तीने लग्न, लहान गुन्हे, चाइल्ड पोर्नोग्राफी, भीक मागायला लावणे, अंमली पदार्थाची तस्करी, अवयव काढून घेणे आदी विविध गुन्ह्यांसाठी प्रामुख्याने मानवी तस्करी होत आहे. विशेष म्हणजे वेश्या व्यवसाय, जबरदस्तीने घरात कोंडून वापर करून घेण्यासाठी परदेशी मुला-मुलींचा छळ केला जात आहे. यामध्ये बांगलादेश, कझागिस्तान, उझबेकिस्तान, नेपाळ, रशिया, थायलंड, मलेशिया येथील लहान मुली-मुलांना भारतात आणून त्यांचा लैंगिक छळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. वरील सर्वच देशांमधून विविध कारणांसाठी नागरिक महाराष्ट्रात येत असल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो'चा हा अहवाल असून, यंदा तो निवडणुकानंतर उशिराने प्रकाशित झाला आहे. प्रामुख्याने पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांमध्ये वेश्या व्यवसायासाठी लहान मुली-मुलांची तस्करी केली जात असल्याचे दिसून येते. वेश्या व्यवसायाचे हे रॅकेट राज्यांतर्गत आणि त्यानंतर तेलंगण, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली येथून चालविले जात आहे. या राज्यातून महाराष्ट्रात लहान मुला-मुलींची तस्करी केली जाते; मात्र त्या तुलनेत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण नगण्य आहे. वेश्या व्यवसायात सापडणाऱ्या मुली आणि त्यांचा छळ करणारे दलाल हे पोलिसांच्या रेकॉर्डवर येण्याचे प्रमाण महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत अधिक असले, तरी अद्याप राज्यातील अनेक गुन्हे उघडकीसच येत नसल्याचे
वास्तव आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. सर्वच देशांतून एक-एक प्रतिनिधींना आमंत्रित करून याबाबत चर्चासत्र आयोजित केली जातात; परंतु त्यावर ठोस तोडगा काढण्यात भारत किंबहुना महाराष्ट्राला अद्याप यश आलेले नाही. मानवी तस्करीत 'वेश्या व्यवसाय' थेट सहभाग असणाऱ्यांवर कारवाईचा प्रयत्न केला जातो. परंतु, मसाज सेंटर, डेटिंग, सोशल डेटिंग (व्हिडिओ कॉलिंग) द्वारे चालणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना आणि त्यांचे दलाल अद्यापही मोकाटच राहिलेले दिसून येते आहे.