म. टा. प्रतिनिधी, पुणे
'देशाचे सुमारे चाळीस उपग्रह अवकाशात अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यातील एक-दोन उपग्रह बंद पडल्यास त्याचा मोठा फटका देशाला बसू शकतो. म्हणूनच अवकाशात उपग्रहाची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या काळात उपग्रहाचे सुरक्षा कवच म्हणून मिशन शक्ती क्षेपणास्र काम करणार आहे. इतर देशाने आपले उपग्रह नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास त्यासही भेदण्याचे काम मिशन शक्ती करेल. मिशन शक्तीच्या रूपाने अवकाशात युद्ध लढण्यासही भारत सक्षम झाला आहे,' असा विश्वास इस्रोचे माजी संचालक डॉ. सुरेश नाईक यांनी व्यक्त केला.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४५व्या ज्ञानसत्रात डॉ. नाईक यांनी सातवे पुष्प गुंफले. स. गो. बर्वे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित 'अंतरिक्ष विज्ञान' विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. नाईक म्हणाले, 'चंद्रयान १ आणि २ या मोहिमुळे भारत बलाढ्य झाला आहे. मंगळावर यशस्वी मोहीम राबवून संशोधनात केवळ आघाडी घेतली नाही, तर बलाढ्य राष्ट्रात स्थान निर्माण केले आहे. आजपर्यंत जगातून अवकाशात सुमारे १५ हजार उपग्रह सोडण्यात आले आहेत. त्यातील ८५ टक्के उपग्रह मृतावस्थेत आहेत. अवकाशाच्या कक्षेत मृत उपग्रहाचा प्रचंड कचरा वाढला आहे. त्यामुळे अवकाशात नवीन उपग्रहासाठी जागा शिल्लक नाही. मृत उपग्रहाचे तुकडे त्याच कक्षेत वर्षानुवर्षे फिरत राहतात. ते तुकडे कार्यरत असलेल्या उपग्रहाला धडकल्यास चांगले उपग्रह निकामी होऊ शकते.'
'२१व्या शतकात महायुद्ध झाल्यास ते अवकाशात लढले जाईल. त्याचीच तयारी म्हणून भारताला आधुनिक अस्त्रांची निर्मिती करावी लागेल. ती अस्त्रे जमीन ते अवकाश, अवकाश ते जमीन आणि अवकाश ते अवकाश अशी असतील. त्या युद्धाचे स्वरूप कम्युनिकेशन जॅमिंग, लेझरने लक्ष भेदणे आणि लेझरने उपग्रह नष्ट करणे असे असेल. यातील पहिला टप्पा म्हणजेच जमीन ते अवकाश युद्धासाठी मिशन शक्ती क्षेपणास्त्र आहे. पुढील दोन टप्याची अस्त्र तयार करावी लागणार आहेत,' असे डॉ. नाईक यांनी सांगितले. अभिषेक घैसास याने प्रास्ताविक केले.