पुणे : पुणेकरांसमोर उभे ठाकलेले पाण्याचे संकट केवळ सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी आणि निष्काळजीपणामुळे निर्माण झाले आहे. पुणेकरांनी मोठ्या आशेने भाजपचे आठ आमदार, ९८ नगरसेवक आणि तीन खासदार दिले आहेत. राज्यात तसेच केंद्रातही भाजपचेच सरकार असूनही सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिनसाठी प्रयत्न केले नाहीत. या उलट शहराच्या नशिबी अकार्यक्षम आणि भ्रष्ट कारभार आल्याचा आरोप माजी आमदार मोहन जोशी यांनी केला.
'गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागल्याने त्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. डिसेंबर महिन्यात जर पाण्याची ही अवस्था असेल तर पुढील वर्षी मे-जून पर्यंत किती मोठे संकट उभे राहील,' असा सवालही जोशी यांनी व्यक्त केला. पाणीप्रश्नाबाबत सर्वांनी एकजूट दाखवून सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे. केवळ वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण बाजूला ठेवून पाटबंधारे खात्यासोबत वाटाघाटींद्वारे पाणीप्रश्न सोडवला पाहिजे. अन्यथा भाजपची छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशप्रमाणेच अवस्था होईल. पुणेकरांच्या रोषाला त्यांना तोंड द्यावे लागेल, असा टोलाही जोशी यांनी लगावला.
.............
आज लाक्षणिक उपोषण
पाणीकपातीच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अनंत गाडगीळ, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे मंडईतील टिळक पुतळा येथे आज, शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत लाक्षणिक उपोषण करणार आहेत.