म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र, जगभरातील लोकशाहीचे स्वरूप बदलले आहे. या बदललेल्या स्वरूपात पत्रकारितादेखील दाबली जात असून, या परिस्थितीत पत्रकारितेची निष्ठा टिकून राहणे महत्त्वाचे आहे,' असे मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी बुधवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कै. ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानात 'माध्यमांची बदललेली भाषा' या विषयी डॉ. देवी बोलत होते. संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि खजिनदार सुनील जगताप या वेळी उपस्थित होते. सध्या पत्रकारितेची भाषा बदलली जात आहे. वर्तमान पत्रात दैनंदिन प्रसिद्ध होणाऱ्या भाषेत किती चुका असतात, हा मुद्दा गौण आहे. त्यात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, विश्लेषण हे किती निष्ठेने लिहिले आहे, ते महत्त्वाचे आहे, असे डॉ. देवी यांनी स्पष्ट केले.
माणूस भाषा सोडून दुसऱ्या एका संवाद माध्यमाकडे वेगाने जात आहे. चित्रांच्या माध्यमातून जगाचे ज्ञान मिळवायचे, अशी मेंदूची जडणघडण होऊ लागल्याचे दिसून येते. एका ठिकाणी एकापेक्षा अधिक माणसे असतात, तेव्हा ती एकमेकांशी गप्पा मारताना दिसत नाहीत. त्या सर्वांचे लक्ष मोबाइलमध्येच असते. आजच्या तरुणांना नोकरी नसेल, तरी चालेल. मात्र, इंटरनेटचा स्पीड मिळाला नाही, तर राग येतो. त्यामुळे येत्या काळात चित्र हाच संवादाचा पाया ठरू शकतो, असेही डॉ. देवी यांनी सांगितले.
\Bनिष्ठा की सुख?
\Bपत्रकारितेत निष्ठेने काम करणारे आर्थिकदृष्ट्या सुखी असतील, असे वाटत नाही; परंतु निष्ठा की सुख हा निर्णय त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन डॉ. गणेश देवी यांनी केले. वर्तमानपत्रांची आर्थिक निती बदलली असल्याचेही त्यांनी सांगितले.