'अॅम्फी थिएटर'मध्ये रंगलेल्या कार्यक्रमात शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाला पुणेकरांचा सलाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
''मिशन' ठरले. सहा महिने त्याचा अभ्यास झाला. एक वर्ष सखोल नियोजन झाले आणि त्यानंतर देशभरातील शास्त्रज्ञांच्या गटांनी दररोज १६-१८ तास त्यावर काम केले. शास्त्रज्ञांच्या चमूला विभागून काम दिल्याने पूर्ण 'मिशन' आहे तरी काय, हे कुणालाच समजले नाही. यात कमालीची गुप्तता राखली गेली. अगदी 'इस्त्रो'लाही हे नेमके काय चालले आहे, याची पुरेशी कल्पना नव्हती. अखेरीस ओडिशातून डागलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशातील आपल्याच उपग्रहाचा अचूक वेध घेतला आणि 'मिशन शक्ती' यशस्वी झाले...'
...अशा स्वरूपात अगदी दोन महिन्यांपूर्वीची भारताची एक सर्वांत मोठी यशोगाथा प्रकल्पप्रमुखांच्याच शब्दात पुणेकरांसमोर उलगडली, आणि फर्ग्युसन कॉलेजच्या 'अॅम्फी थिएटर'मध्ये जमलेल्या पुणेकरांनी उभे राहून टाळ्यांचा गजर करत शास्त्रज्ञांच्या या कर्तृत्वाला सलाम केला. निमित्त होते, 'विज्ञान भारती आणि फर्ग्युसन महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसानिमित्त संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) 'मिशन शक्ती' चे प्रकल्प संचालक डॉ. यू. राजाबाबू यांच्या व्याख्यानाचे. एअर मार्शल भूषण गोखले (नि.) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर (नि.), डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे आदी या वेळी उपस्थित होते.
'जवळपास सर्वच देशांचे उपग्रह अवकाशात सक्रिय आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. भविष्यात अवकाशातही युद्ध खेळले जाऊन उपग्रहांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्यासाठीच आपल्याकडे उपग्रह नष्ट करण्याची क्षमता असणे व ती सिद्ध करणे गरजेचे होते. सन २०१६मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'डीआरडीओ'च्या शास्त्रज्ञांसमोर 'मिशन शक्ती'ची कल्पना मांडली. 'डीआरडीओ'च्या प्रमुखांनी त्याला होकार दिला. त्यानंतर सहा महिने त्याचा अभ्यास केला गेला. त्यानंतर एक वर्ष त्यावर अभ्यास झाला. सर्व प्राथमिक आराखडा झाल्यानंतर 'डीआरडीओ'च्या देशभरातील काही निवडक प्रयोगशाळांमधील मोजक्या शास्त्रज्ञांना त्याची जबाबदारी दिली गेली. ही जबाबदारी विभागून दिल्याने पूर्ण 'मिशन' काय आहे, हे कोणालाही समजले नाही. त्याचदरम्यान, 'डीआरडीओ'ने 'इस्त्रो'ला अवकाशात अडीचशे किलोमीटर उंचीवर एक उपग्रह सोडण्याची विनंती केली. इतक्या कमी उंचीवर उपग्रह कशासाठी हवा आहे, हे 'इस्त्रो'लाही सांगितलेले नव्हते. अखेरीस जानेवारी २०१९मध्ये उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आणि २७ मार्च रोजी हाच उपग्रह आपण उपग्रहभेदी क्षेपणास्त्राद्वारे नष्ट करण्यात भारताला यश आले,' असे डॉ. राजाबाबू यांनी सांगितले. अडीचशे किलोमीटरवरच उपग्रहाचा वेध घेतल्यामुळे निर्माण होणारा कचरा लवकर नष्ट होतो, म्हणून ही उंची निवडली गेली, असेही ते म्हणाले.
\B
सर्वांत मोठी यशोगाथा
\B'या मिशनविषयी थोडी माहिती जरी बाहेर आली असती, तरी आंतरराष्ट्रीय दबाव येऊन आपल्याला ही चाचणी करता आली नसती. त्यामुळे गुप्तता राखणे हेच मोठे आव्हान होते. या मिशनमधील बहुतांश तंत्रज्ञानही पूर्णत: भारतीय बनावटीचे होते. त्यामुळेच ही भारताची एक सर्वांत मोठी यशोगाथा आहे,' असे डॉ. राजाबाबू म्हणाले.
'भारताकडे १९७०पासूनच अणुचाचणी करण्याची क्षमता होती. मोजक्या अण्वस्त्रसज्ज देशांनी आपल्यावर दबाव आणला. क्षमता असतानाही केवळ चाचणी केली नाही, म्हणून आपण अनेक वर्षे मागे राहिलो. तसेच, उपग्रहभेदी क्षमतेबाबतही घडले असते. त्यामुळेच ही चाचणी करणे आवश्यक होते. ही क्षमता सिद्ध झाल्याने जगभर भारताचा दरारा निर्माण झाला,' असेही डॉ. राजाबाबू म्हणाले.
\Bदोन वर्षांत मिशन फत्ते
\B'भारताच्या क्षमतेविषयी जगभर कुतूहल आहे. इतर प्रगत देशांनीही ३०-४० वर्षांत जे तंत्रज्ञान विकसित केले, तेच तंत्रज्ञान भारताने शून्यातून सुरुवात करत केवळ सहा-आठ वर्षांत सिद्ध केले. मिशन शक्तीही अवघ्या दोन वर्षांत फत्ते झाले. इतक्या कमी काळात भारत ही क्षमता सिद्ध करेल, असे आघाडीच्या देशांनाही वाटले नव्हते,' असे डॉ. यू. राजाबाबू म्हणाले.