म. टा. प्रतिनिधी, पुणे
'लख्ख हसता हसता झाले मनभर ऊन, मनजडीच्या उन्हाला आला बहर बहर...' या गीताच्या गायनातून अपर्णा केळकर यांचे सूर सभागृहात गुंजत राहिले. गीत संपले तरी सारे प्रेक्षक मुग्ध होऊन बसले होते. 'समजुतीच्या काठाशी' या संगीतमय कार्यक्रमातून साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर आधारित सुश्राव्य मैफल रंगली.
अरुणा ढेरे यांची जवळपास पन्नास पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये कविता, कथा, कादंबरी, ललितलेख, संशोधन, संपादन असे अनेक प्रकार आहेत. या सगळ्याची अतिशय नेटकी आणि रसपूर्ण गुंफण डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या संहितालेखनात होती. अनेक कविता, लेखांचे अंश, कृष्णकिनारामधील कृष्ण-कुंती संवाद असे वैविध्य कार्यक्रमात होते. नव्या जुन्याच्या काठावर ती...घन वळले रे उमाळणारे, कोवळ्या उन्हात जीव गुंतला... या कविता अपर्णा केळकर यांनी स्वरबद्ध केल्या आणि गायल्या. काही कवितांना त्यांनी आलापीची जोड दिली होती. सिंथेसायझरची साथ निनाद सोलापूरकर यांनी केली.
अक्षय वाटवे, अनुराधा जोशी आणि वंदना बोकील-कुलकर्णी यांनी कविता वाचन केले. निरोप, अकस्मात, जनी, निळा, रंग महाली विठूच्या या कवितांना दाद मिळाली. संवादसेतू, पुणे यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमाची सांगता 'करुणाष्टक' या काव्यगायनाने झाली.