म. टा. प्रतिनिधी, पुणे
पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी शहरातील जलद बस वाहतूक सेवेच्या (बीआरटी) देखभाल-दुरुस्ती समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. या समितीची काही महिन्यांपासून बैठकच झालेली नसून, सदस्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे कारण देत राठी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना आपला राजीनामा पाठविला आहे.
काही दिवसांपूर्वी नागरिक चेतना मंचाच्या कनीझ सुखरानी यांनी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्या पाठोपाठ जुगल राठी यांनीही राजीनामा दिल्याने समितीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीआरटी व्यवस्थेत सुधारणा घडविण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांनी मार्च २०१८ मध्ये ही समिती स्थापन केली होती. पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत जुगल राठी यांचा समावेश होता. दर १५ दिवसांनी या समितीच्या सदस्यांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांत केवळ चारच बैठका झाल्याने सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. बैठकीत करण्यात आलेल्या सूचनांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा दावा सदस्यांकडून केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर राठी यांनी आयुक्तांकडे आपला राजीनामा दिला आहे.