म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुण्यातून मुंबईसह अन्य महत्त्वाच्या मार्गांवर जाणाऱ्या बस मराठा क्रांती मोर्चा आंदोलनामुळे बुधवारी बंद होत्या. त्यामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. पुणे-मुंबई मार्गावर सायंकाळपर्यंत केवळ १२ गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. त्यामध्ये बुधवारी मुंबई विभागात बंद पुकारण्यात आला होता. या 'बंद'मध्ये काही ठिकाणी एसटीच्या गाड्यांचे नुकसान करण्यात आले; तसेच, मराठवाड्यातही वातावरण तापलेलेच होते. त्यामुळे एसटीच्या गाड्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाकडून गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. पुणे-मुंबई मार्गावर 'शिवनेरी'च्या दैनंदिन २२० फेऱ्या होतात. त्यापैकी सायंकाळपर्यंत केवळ १२ फेऱ्या झाल्या होत्या. त्याबरोबरच औरंगाबाद, लातूर व मराठवाडा, विदर्भातील अन्य मार्गांवर मंगळवारपासूनच सेवा बंद ठेवण्यात आली आहे. बुधवारी त्यासह नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी मार्गांवरील गाड्या रद्द झाल्या. राज्यात एसटीची २५० आगारे आहेत. त्या आगारांमधून दररोज सायंकाळी चार वाजेपर्यंत १४ हजार ५५० बस धावतात. मात्र, बुधवारी त्यापैकी केवळ आठ हजार ९६९ बस प्रवाशांच्या सेवेत धावल्या. एकूण आगारांपैकी ५६ आगारे बंद होती; तर १९४ आगारे अशंत: बंद होती. पुणे विभागात ६१२ फेऱ्या रद्द झाल्या. पुणे विभागातील ५५ आगारांतून दररोज दररोज दोन हजार १५५ फेऱ्या होतात. बुधवारी १५४३ फेऱ्या झाल्या. केवळ पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बस सुरळीत चालू होत्या.
---