म. टा. प्रतिनिधी, पुणे
'जम्मू-काश्मीर हे कायमच पर्यटकांचे आकर्षण राहिले असून, पर्यटन व्यवसाय हाच या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा स्रोत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याच्या धोरणात्मक निर्णयाचा पर्यटनावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. त्यामुळे पर्यटकांसाठी देशाच्या अन्य भागाप्रमाणे जम्मू-काश्मीरही सुरक्षितच आहे,' अशी माहिती शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचे संचालक जावेद बक्षी यांनी सोमवारी दिली.
'पर्यटन हा जम्मूवासीय आणि काश्मिरींच्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे पुणेकरांनी अधिकाधिक संख्येने या राज्यात पर्यटनासाठी यावे,' असे आवाहनही त्यांनी केले.
'पहलगाम हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन' आणि 'जम्मू-काश्मीर टुरिझम'तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष आसिफ इक्बाल बुर्झा, 'सरहद' संस्थेचे संजय नहार, डॉ. विश्वास केळकर आदी या वेळी उपस्थित होते. 'कलम ३७० हटविण्याचा निर्णय धोरणात्मक असून, त्याचा पर्यटनाशी काहीही संबंध नाही. सीमावर्ती भागात तणाव असला, तरी त्याचा पर्यटनावर कोणताही परिणाम होत नाही,' असे बक्षी यांनी नमूद केले; तर 'पर्यटन हे कायमच काश्मीरच्या केंद्रस्थानी राहिले असून, काश्मिरींकडून त्याला कायमच महत्त्व दिले जाते. प्रत्येक महिन्यात या प्रदेशात निसर्गाचे वेगळे रूप अनुभवता येते. मार्च ते जुलैदरम्यान येथे पर्यटकांची संख्या जास्त असते. येत्या हंगामातही पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज असून, देशभरातील नागरिकांनी पर्यटनासाठी काश्मीरमध्ये येऊन, काश्मिरींना पाठबळ द्यावे,' असे आवाहन आसिफ बुर्झा यांनी केले.
....