म. टा. प्रतिनिधी, पुणे
'दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव. या सणाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनातील समस्या आणि दु:ख नष्ट व्हावीत, धर्माच्या नावाने जे प्रश्न निर्माण झाले आहेत, ते आपण सगळ्यांनी सोडवले पाहिजेत. आनंद आणि शांती आणण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळण्याची गरज आहे,' असे मत बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले.
दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना डाबरे म्हणाले, 'धर्म ही मानवतेला मिळालेली एक अनमोल भेट आहे. प्रत्येक धर्म हा ईश्वराकडे आणि अंतिम सत्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. दैनंदिन जीवनातील हाल अपेष्टा, समस्या सुसह्य होऊन त्यातून मुक्ती मिळावी, यासाठी प्रत्येक धर्मामध्ये सणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारतासारख्या विविध जाती, धर्मांनी एकवटलेल्या देशामध्ये प्रत्येक जण त्या धर्मापुरता मर्यादित न राहता सर्व धर्मीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करतो.'
ते म्हणाले, 'धर्माने सर्व माणसाच्या हृदयामध्ये आणि जीवनात आनंद आणि शांती आणलेली आहे. त्यामुळे निरीश्वरवाद, अज्ञेयवाद, शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवरही धर्माचे अस्तित्त्व टिकून आहे. पण, आज समाजामध्ये दहशतवाद, कट्टरपणा, वैरभाव, भेदभाव, अनैतिकता या गोष्टी वाढीस लागल्या आहेत. धार्मिकतेला राष्ट्रहितापेक्षा जास्त प्राधान्य दिले तर असहिष्णुता, सामाजिक भीती आणि अस्थितरतेचे वातावरण तयार होते. त्यामुळे सर्व धर्मीयांनी राष्ट्रनिष्ठा प्रबळ केली पाहिजे.
डाबरे यांचा फोटो वापरता येईल