गणेशोत्सवातील सजावट आणि जीवन रणधीर यांचे अतूट नाते होते. रणधीर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात भव्य सजावटी आणि अभिनव संकल्पनांचे चित्ररथ साकारले. पुण्याचा गणेशोत्सव ज्यांनी देखणा केला, अशा व्यक्तींमध्ये रणधीर यांचे नाव अग्रक्रमाने येते. गणेशोत्सवात नावीन्यपूर्ण कल्पनांनी सजावटीचा आविष्कार घडविणारे जीवन रणधीर आज हयात नसले, तरी त्यांनी साकारलेल्या सजावटींच्या प्रतिमा आजही पुणेकरांच्या डोळ्यांत ताज्या आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत स्वकष्टाने शिक्षण घेऊन, जीवन रणधीर यांनी कलेची आवड जोपासली. अत्यल्प खर्चातील साहित्याचा वापर करून, भव्य देखावे साकारणारे आणि व्यवहारापलीकडे जाऊन उत्सवावर मनापासून प्रेम करणारा मनस्वी कलाकार म्हणून ते ओळखले जायचे. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवात सेवा म्हणून रांगोळी काढून, सर्वांचे लक्ष वेधून घेणारे जीवन रणधीर आजही अनेकांना आठवतात. मंडईच्या कट्ट्यावर गप्पांचा फड रंगविण्यात त्यांचा हात कुणी धरला नाही. कलेतच रममाण झालेल्या जीवन यांनी कधी व्यवहार पाहिला नाही. अनेकदा त्यांच्याकडून कल्पकता घेऊन कार्यकर्ते दुसऱ्या कलाकाराकडून काम करून घ्यायचे. हे समजल्यानंतरही त्यांनी कधी राग व्यक्त केला नाही. याच गुणांमुळे ते गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते.
जीवन रणधीर हे जिलब्या मारुती मंडळाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा रथ हे जणू त्यांच्यासाठी घरचेच कार्य असायचे. हुतात्मा बाबू गेनू मंडळासाठी ग्रीक-रोमन- इजिप्शियन संस्कृतीचा देखावा, शनिपार मंडळासाठी अलिबाबाचा खजिना, रंगीबेरंगी पतंग आणि छत्र्या यांची सजावट असलेला चित्ररथ, भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचे अभिनंदन करण्यासाठी केलेला आकर्षक चित्ररथ, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी व ज्येष्ठ सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न किताब मिळाल्यानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी केलेला रथ, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केलेला रथ, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त केलेला रथ ही रणधीर यांच्या सर्जनाची उदाहरणे आहेत.
पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाचे विसर्जन मिरवणूक हे खास आकर्षण असते. या मिरवणुकीत रथ महत्त्वाची भूमिका बजावतो. डोळ्यांचे पारणे फेडणारे रथ करण्याची परंपरा रणधीर यांनी जपली. नावीन्यपूर्ण विषयांची गुंफण करून, रणधीर यांनी ३५ वर्षे सेवा बजावली. ही परंपरा त्यांचा मुलगा क्षितिज पुढे नेत आहे. क्षितिजने यापूर्वी श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट आणि वीर हनुमान मित्र मंडळ यांच्यासाठी रथ करून आविष्कार घडवला आहे.
(संकलन : चिंतामणी पत्की)