म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कुणाशीही बोलताना मराठीला विसरून आपण सहज हिंदीत बोलू लागतो. भाषेबाबत आपण आत्मविश्वास गमावला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या बाबतीत मराठी भाषकांची अवस्था 'दिल टाकून कुस्ती खेळणाऱ्या' पैलवानासारखी झाली आहे,' असे वक्तव्य करून, ख्यातनाम लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांनी मराठी भाषकांची बुधवारी खरडपट्टी काढली. 'मराठी भाषा बोलणे, भाषेचे संवर्धन, अभिजात भाषेचा दर्जा या बाबतीत आपण कधीच हार मानली आहे. पराभव मान्य करूनच आपण आखाड्यात उतरतो,' अशी टीका त्यांनी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 'सांस्कृतिक कट्टा' या उपक्रमात पत्रकारांनी पठारे यांच्याशी संवाद साधला. संघाचे उपाध्यक्ष सुकृत मोकाशी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, खजिनदार सुनील जगताप उपस्थित होते. प्रशांत बिडवे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल कविटकर यांनी आभार मानले.
'केंद्र सरकारतर्फे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे राज्याचे भाषामंत्री विनोद तावडे सतत सांगतात. मात्र, वस्तुस्थिती काय आहे,' असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पठारे यांनी '२०१३ मध्ये माझ्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा कसा मिळू शकतो, या संदर्भात अहवाल सादर केला. राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्राने साहित्य अकादमीकडून मूल्यमापन करून घेतले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास कोणतीच अडचण नाही; पण मंत्री तीच तीच उत्तरे देऊन वेळ मारून नेतात,' अशी टीका त्यांनी केली.
'सहा वर्षे झाली, तरी निर्णय होत नसेल, तर मराठी खासदार, मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांनी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हा विषय आला पाहिजे. 'अभिजात दर्जासाठी काय करावे,' हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडतो, हे चमत्कारिक आहे, असा टोला पठारे यांनी हाणला. 'मराठी लोकांचा पसारा देशभर होता. भाषावार प्रांतरचनेनंतर मराठीचे नुकसान झाले. ब्रिटिश आले नसते, तर भारतावर मराठ्यांचे राज्य असते,' या शशी थरूर यांच्या विधानाशी पठारे यांनी सहमती दर्शवली.
राष्ट्रवादामुळे भिंती!
'कोणत्याही देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती सुटी नसून, जागतिक परिमाणाचा संदर्भ असतो. युरोपात शुद्ध वंशाची चळवळ सुरू आहे. उदारमतवादी, स्वागतशील लोक का बदलत आहेत, हा गंभीर प्रश्न असून, आपण विनाशाच्या कड्यावर उभे आहोत. कोणत्याही जगाचा मूर्ख राष्ट्राध्यक्ष अणुबॉम्ब टाकू शकतो. राष्ट्रवादामुळे भिंती निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रवाद एका टप्प्यानंतर मानवी प्रजातीला संकुचित करतो. सर्व देशातील प्रश्न राष्ट्रवादामुळे आहेत,' अशी टीका त्यांनी केली.
साक्षर लोकांची संस्कृती बोन्साय करण्यासाठी टपलेली असते. बोन्साय व्हायचे, की वड होऊन व्यक्त व्हायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. व्यक्त होणे कठीण झाले आहे, हे खरे; पण गुलाम होऊन जीवनमान उंचावण्यास अर्थ नाही. सामान्य लोक कसल्यातरी सावटाखाली आहेत. त्यांना बाहेर काढून निर्भय करण्याची जबाबदारी माध्यमांची आहे.
- प्रा. रंगनाथ पठारे, ख्यातनाम लेखक