मटा मालिका
Chaitrali.chandorkar@timesgroup.com
@chaitralicMT
पुणे : महाबळेश्वर पाचगणीसाठी गेल्या तीन वर्षांत केलेल्या उपक्रमांना आता यश मिळायला सुरुवात झाली आहे. घोडागाड्यांवर बंधन घातल्याने यंदा माळराने बहरली, नादुरुस्त मैलापाणी शुद्धिकरण प्रकल्प कार्यान्वित झाल्याने जलप्रदूषण घटले. वेण्णा नदीच्या पूररेषा निश्चितिचे काम प्रस्तावित आहे, यामुळे अतिक्रमणांचा धोका टळणार आहे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने महाबळेश्वर-पाचगणीसाठी नेमलेल्या उच्च स्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी दिले.
पुण्यातील रानवा संस्था सध्या महाबळेश्वर पाचगणीच्या जैववैविध्याचा सर्वंकष अहवाल तयार करत आहे. या समितीने दिलेल्या प्राथमिक निकषांच्या निमित्ताने डॉ. पटवर्धन यांनी समितीने स्थानिक प्रशासनाच्या सहभागातून गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामांची माहिती 'मटा'ला सांगितली.
'पर्यटन हे विकासाचे इंजिन आहे, असे मानले जाते. त्या अनुषंगाने हा परिसर एक चांगले मॉडेल होऊ शकते,' असे सांगून पटवर्धन म्हणाले, 'पाचगणी पठारावरील फुलांचा बहर गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत खूप चांगला होता. तेथील जैवविविधता पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळाली. यासाठी एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरले. मुळात पाचगणी टेबल लँड हा शंभर एकरचे पठार आहे, त्यातील ८० टक्के पठार संवेदनशील आहे. वनस्पती अभ्यासक डॉ. अपर्णा वाटवे यांच्या सूचनांनुसर आम्ही गेल्या दीड वर्षांत घोड्यांसाठीचे फिरण्याचे मार्ग ठरवून दिले होते. घोडागाड्यांना उरलेल्या २० एकरमध्ये परवानगी दिली. पूर्वी घोडागाड्या पठारावर कुठेही फिरत असल्याने तेथील जैववैविध्य धोक्यात आले होते. यंदा महाबळेश्वरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिता दगडे आणि वन विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे पठाराला संरक्षण मिळाले. येथील हाबेनारिया पांचगणेसीस या प्रदेशनिष्ठ ऑर्किडचा ताटवा व युट्रिक्युलारिया, स्मिथिया खूप वर्षांनी फोफावला.'
'महाबळेश्वरमधील मैलापाणी शुद्धिकरण प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून बंद होता. दररोज तयार होणारे लाखो लिटर प्रदूषित पाणी थेट डोंगरदरऱ्यांमध्ये जात होते. जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने याचे पर्यावरणीय गांभीर्य ओळखून बंद प्रकल्प कार्यान्वित केले. त्यामुळे जलप्रदूषण घटले. वेण्णा नदीची पूररेषा अद्याप निश्चित केलेली नसल्याने काठावरील बांधकामे आणि अतिक्रमणे वाढत आहेत, असे समितीच्या लक्षात आले. जिल्हा प्रशासन पूररेषा निश्चितीसाठी पाठपुरावा करत आहे. वनक्षेत्र वाढले असून, काही वारसा स्थळांजवळील अतिक्रमणेही काढली आहेत,' असे पटवर्धन यांनी सांगितले.
(समाप्त)
...
महाबळेश्वर, पाचगणीतील निसर्ग संवर्धनासाठी स्थानिक जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि लोकसहभाग आवश्यक आहे. नियोजित कामात सातत्य राहिल्यास निश्चितच येथील जैवविविधता आणि वन्यजीवन सुधारेल. रानवा संस्थेच्या सर्वेक्षणानंतर महाबळेश्वरच्या पर्यटकांना पेलण्याच्या क्षमतेबद्दलही (कॅरिंग कपॅसिटी) ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.
- डॉ. अंकुर पटवर्धन, अध्यक्ष, केंद्रीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती, महाबळेश्वर, पाचगणी
...
रानवा संस्थेची प्रमुख निरीक्षणे
- महाबळेश्वर, पाचगणीतील संवेदनशील क्षेत्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी ५२.२४ टक्के क्षेत्र वनाखाली आहे. वन जमिनीवरील जंगल टिकून आहे, पण उपग्रहातील छायाचित्रांनुसार खासगी क्षेत्रावरील झाडोरा १५ वर्षांत घटला आहे.
- १९८०च्या दशकात महाबळेश्वरामध्ये फिरताना लाकडाच्या मोळ्या वाहून घेऊन बाजारपेठेच्या दिशेने जाणारे लोक दिसायचे. हंगामात प्रतिदिन सरासरी पाचशे मोळ्या (सुमारे ५ टन लाकूड) जंगलातून काढले जात असल्याच्या नोंदी आहेत. आता हे दृश्य दुर्मिळ झाले असून, लोक केरोसीन, स्वयंपाकाचा गॅस यांचा वापर करतात.
- महाबळेश्वर पाचगणीत आतापर्यंत झालेल्या संशोधनात ३५० पेक्षा अधिक वृक्षांच्या प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी सुमारे ७० वृक्ष प्रजातींचा आढावा समिततीने सहा महिन्यांत घेतला; तसेच पाचगणीच्या टेबल लँड पठारावर आमरीसह ३० प्रजातींची नोंद घेतली आहे.