अ‍ॅपशहर

पीएमआरडीएद्वारा करा ‘मेपल शेल्टर’ची चौकशी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांमध्ये घर देण्याची जाहिरातीद्वारे घोषणा करणाऱ्या ‘मेपल शेल्टर’ कंपनीची पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. चौकशीअंती ही योजना खरोखरच चांगली असल्याचे आढळल्यास राज्य सरकारने पालकत्व स्वीकारून संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून घरे बांधून घ्यावीत, असेही त्या म्हणाल्या.

Maharashtra Times 20 Apr 2016, 3:24 am
डॉ. नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maple grou fraud pune affordable housing
पीएमआरडीएद्वारा करा ‘मेपल शेल्टर’ची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांमध्ये घर देण्याची जाहिरातीद्वारे घोषणा करणाऱ्या ‘मेपल शेल्टर’ कंपनीची पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. चौकशीअंती ही योजना खरोखरच चांगली असल्याचे आढळल्यास राज्य सरकारने पालकत्व स्वीकारून संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून घरे बांधून घ्यावीत, असेही त्या म्हणाल्या.
‘या योजनेमध्ये कोणाचे हितसंबंध गुंतले असल्याचा संशय ​निर्माण होत आहे. त्यामुळे पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी. चौकशीनंतर ही योजना चांगली असल्याचे आढळल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून एक हजार घरे बांधून घेण्यात यावेत,’ असेही श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या. ‘पाच लाख रुपयांत घरे मिळणार असतील तर, सामान्यांचा फायदाच होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेचे पालकत्व स्वीकारावे,’ असे त्या म्हणाल्या.
‘विधिमंडळाच्या अधिवेशनात पुण्यासंबंधी अनेक प्रश्नांवर लक्षवेधी मांडून ते मार्गी लावण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, विजेची बिले उशिरा देणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई, पुण्याच्या फॅमिली कोर्टाचे प्रलंबित काम आदींचा समावेश आहे,’ असेही गोऱ्हे यांनी नमूद केले.
‘या अधिवेशनात हवामान बदलाविषयी सरकारने कृती आराखडा बनविण्याची मागणी केली. उद्योजक महिलांसाठी उद्योग विभागाचे धोरण, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वाती अभय योजना, बस आणि टॅक्सीत महिलांसाठी आरक्षित आसने, भामा आसखेड योजना २०१७पर्यंत पूर्ण करणे, ‘पीएमआरडीए’कडून रिंगरोड पूर्ण करणे आदी आश्वासने मिळाली,’ असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेची भूमिका अखंडित महाराष्ट्राची आहे. या बाबतचा प्रस्तावही सरकारकडे देण्यात आला आहे. तो अद्याप प्रलंबित असल्याचेह त्या म्हणाल्या.
..........
‘पंकजांचे वक्तव्य अनाठायी’
राज्य सरकारमधील दोन ते तीन मंत्र्यांच्या वर्तनावरून सरकारविषयी मत मांडणे योग्य नाही अशी भूमिका मांडत असतानाच, गोऱ्हे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘बियर उद्योगांसाठी पाणी आरक्षित असल्याचे वक्तव्य मुंडे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करण्यापूर्वीचे मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी आहे,’ असे गोऱ्हे म्हणाल्या. बियरऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज