पुण्यात लाखो मराठ्यांची मूक गर्जना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोणतीही घोषणा नाही, भाषण नाही आणि गडबड-गोंधळही नाही...! शांतता आणि संयमातही किती प्रचंड शक्ती असते, याची प्रचिती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जमलेल्या विराट जनसमुदायाने रविवारी पुणेकरांना दिली; मात्र हा मूक मोर्चा असला, तरी या शांततेतूनच समाजाने केलेल्या गर्जनेने पुण्याचा आसमंत दुमदुमला. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ निघालेला हा मोर्चा पुण्याच्या इतिहासातील अभूतपूर्व ठरला.
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती (मूक) मोर्चाने रविवारी पुण्यात धडक दिली. शहरातील सर्व रस्त्यांवर सकाळपासूनच ‘एक मराठा, लाख मराठा’चा हुंकार पसरला अन् जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांनी विक्रमी गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयात सांगता झाली. सर्वच राजकीय नेत्यांना या वेळी मागे ठेवण्यात आले आणि समाजातील रणरागिणींनी मोर्चाचे नेतृत्व केले. शहराकडे येणारे सर्वच रस्ते दिवसभर भगव्या झेंड्यांनी आणि नागरिकांनी फुलून गेले होते. या अलोट मोर्चाचे नियोजन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यापुढील काळातही आठवणीत राहील, असाच ठरला.
दरम्यान, मोर्चासाठी केवळ मराठा समाजामधूनच नव्हे, तर इतर समाजबांधव आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोलाचे सहकार्य केल्याचे अनुभवायला मिळाले. मोर्चात सहभागी नागरिकांना पिण्याचे पाणी, अल्पोपाहार वाटप करून इतर समाजबांधवांनीही या मोर्चाच्या यशस्वीतेमध्ये खारीचा वाटा उचलला.
वाहतूक कोंडी नाही
मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरूनही नागरिक लाखोंच्या संख्येने पुण्यात आले. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांसह १८ रस्ते बंद करण्यात आले होते. यानंतरही शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र, मोर्चा संपल्यानंतर परतीच्या मार्गावर वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक काही प्रमाणात धीम्या गतीने सुरू होती.
मोर्चासाठी पुण्याबाहेरील बहुतांश नागरिक हे खासगी वाहनांनी शहरात दाखल झाले होते. सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग या रस्त्याने नागरिक आले. या सर्व रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला नाही. तसेच, सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत आवश्यकतेशिवाय बाहेर पडू नये, या वाहतूक पोलिसांच्या आवाहनालाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरही गर्दी कमी होती. वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली नाही.
‘असा मोर्चा पाहिला नाही’
संपूर्ण मोर्चामध्ये तरुणाईचेच वर्चस्व दिसून आले. मोर्चातील नागरिकांच्या संख्येबाबत निरनिराळे अंदाज व्यक्त होत आहेत; मात्र अनेक अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांनीही ‘आपल्या कारकीर्दीत इतका मोठा आणि शिस्तबद्ध मोर्चा पाहिला नाही,’ अशी कबुली दिली आणि त्यावर सर्वांचेच एकमत झाले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि मोर्चाच्या नियोजनमुळे पोलिसांनाही बंदोबस्तासाठी फारसे श्रम घेण्याची वेळ आली नाही. पोलिसांपेक्षाही समाजाच्या स्वयंसेवकांची संख्या मोठी होती. लाउडस्पीकरवरून करण्यात येणाऱ्या सूचनांचे लाखोंच्या समुदायाने कोणतीही नाराजी व्यक्त न करता मनापासून पालन केले आणि महिला-मुलींचा आदर, शिस्त आणि शांतता यांची प्रचिती दिली.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोणतीही घोषणा नाही, भाषण नाही आणि गडबड-गोंधळही नाही...! शांतता आणि संयमातही किती प्रचंड शक्ती असते, याची प्रचिती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जमलेल्या विराट जनसमुदायाने रविवारी पुणेकरांना दिली; मात्र हा मूक मोर्चा असला, तरी या शांततेतूनच समाजाने केलेल्या गर्जनेने पुण्याचा आसमंत दुमदुमला. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ निघालेला हा मोर्चा पुण्याच्या इतिहासातील अभूतपूर्व ठरला.
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती (मूक) मोर्चाने रविवारी पुण्यात धडक दिली. शहरातील सर्व रस्त्यांवर सकाळपासूनच ‘एक मराठा, लाख मराठा’चा हुंकार पसरला अन् जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांनी विक्रमी गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयात सांगता झाली. सर्वच राजकीय नेत्यांना या वेळी मागे ठेवण्यात आले आणि समाजातील रणरागिणींनी मोर्चाचे नेतृत्व केले. शहराकडे येणारे सर्वच रस्ते दिवसभर भगव्या झेंड्यांनी आणि नागरिकांनी फुलून गेले होते. या अलोट मोर्चाचे नियोजन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यापुढील काळातही आठवणीत राहील, असाच ठरला.
दरम्यान, मोर्चासाठी केवळ मराठा समाजामधूनच नव्हे, तर इतर समाजबांधव आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोलाचे सहकार्य केल्याचे अनुभवायला मिळाले. मोर्चात सहभागी नागरिकांना पिण्याचे पाणी, अल्पोपाहार वाटप करून इतर समाजबांधवांनीही या मोर्चाच्या यशस्वीतेमध्ये खारीचा वाटा उचलला.
वाहतूक कोंडी नाही
मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरूनही नागरिक लाखोंच्या संख्येने पुण्यात आले. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांसह १८ रस्ते बंद करण्यात आले होते. यानंतरही शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र, मोर्चा संपल्यानंतर परतीच्या मार्गावर वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक काही प्रमाणात धीम्या गतीने सुरू होती.
मोर्चासाठी पुण्याबाहेरील बहुतांश नागरिक हे खासगी वाहनांनी शहरात दाखल झाले होते. सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग या रस्त्याने नागरिक आले. या सर्व रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला नाही. तसेच, सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत आवश्यकतेशिवाय बाहेर पडू नये, या वाहतूक पोलिसांच्या आवाहनालाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरही गर्दी कमी होती. वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे कोंडीची परिस्थिती निर्माण झाली नाही.
‘असा मोर्चा पाहिला नाही’
संपूर्ण मोर्चामध्ये तरुणाईचेच वर्चस्व दिसून आले. मोर्चातील नागरिकांच्या संख्येबाबत निरनिराळे अंदाज व्यक्त होत आहेत; मात्र अनेक अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांनीही ‘आपल्या कारकीर्दीत इतका मोठा आणि शिस्तबद्ध मोर्चा पाहिला नाही,’ अशी कबुली दिली आणि त्यावर सर्वांचेच एकमत झाले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि मोर्चाच्या नियोजनमुळे पोलिसांनाही बंदोबस्तासाठी फारसे श्रम घेण्याची वेळ आली नाही. पोलिसांपेक्षाही समाजाच्या स्वयंसेवकांची संख्या मोठी होती. लाउडस्पीकरवरून करण्यात येणाऱ्या सूचनांचे लाखोंच्या समुदायाने कोणतीही नाराजी व्यक्त न करता मनापासून पालन केले आणि महिला-मुलींचा आदर, शिस्त आणि शांतता यांची प्रचिती दिली.