अ‍ॅपशहर

पाणी आणि शिक्षणाअभावी मराठवाड्याचा विकास नाही

‘मराठवाड्यात पाणी आणि दर्जेदार शिक्षणाची सोय नसल्यानेच मराठवाड्याचा विकास झालेला नाही,’ असे मत राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी व्यक्त केले. मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवात ते बोलत होते.

Maharashtra Times 18 Sep 2016, 3:00 am
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathawada remain undeveloped due to lack of water and education
पाणी आणि शिक्षणाअभावी मराठवाड्याचा विकास नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मराठवाड्यात पाणी आणि दर्जेदार शिक्षणाची सोय नसल्यानेच मराठवाड्याचा विकास झालेला नाही,’ असे मत राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी व्यक्त केले. मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवात ते बोलत होते.
मराठवाडा समन्वय समितीने मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवात बागडे यांच्या हस्ते मराठवाडा भूषण पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, आदर्श शेतकरी कांतराव देशमुख, लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उद्योजक सचिन इटकर, दिग्दर्शक दिलीप खंडेराय या व्यक्तींना आणि नळदुर्गच्या ‘आपलं घर’ या संस्थेला देण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, युवक क्रांती दलाचे ‘युक्रांद’ अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर उपस्थित होते.
बागडे म्हणाले, ‘मोठ्या संघर्षातून मराठवाड्याची निर्मिती झाली आहे. मराठवाड्यात शेती करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे शेती चांगल्या प्रमाणात होत नाही आणि त्यातून उत्पन्न मिळ‍त नाही. दर्जेदार शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मि‍ळत नाही. याचा प्रतिकूल परिणाम रोजगार निर्मितीवर होऊन विकासात घट होते. त्यामुळे मराठवाड्यात पाणी उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवाराला नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या पाहिजे व त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे.’
या वेळी बागडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कमी दरात जेवण उपलब्ध करणाऱ्या ‘माफक सकस आहार’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘वैभवशाली मराठवाडा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. ठाले पाटील आणि कुमार सप्तर्षी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. धुरगुडे पाटील यांनी प्रास्ताविक केले.
............
स्वतंत्र भारताचे वर्ष चुकले?
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या मराठवाडा मुक्तिदिनाबद्दलच्या भाषणात भारत १९४५ सालामध्ये स्वतंत्र झाला असा एकदा उल्लेख केला. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात उपस्थितांमध्ये एकच कुजबुज निर्माण झाली. काहींनी थेट चर्चा करायला सुरुवात केली. मात्र, बागडे यांनी काही वेळात दुसऱ्यांदा उल्लेख हा १९४७ असा केल्याने सभागृहात पुन्हा शांतता निर्माण झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज