अ‍ॅपशहर

​ नेदरलँडमध्ये भरली ‘माझी शाळा’

राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना परदेशात राहणाऱ्या लहान मुलांची मातृभाषेशी, संस्कृतीशी जोडलेली आपली नाळ तुटू नये यासाठी अॅमस्टरडॅममध्ये मराठी शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.

Maharashtra Times 23 Feb 2017, 4:03 am
परदेशस्थ लहानग्यांची मराठीची भूक भागविणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi learning school opened in netherland
​ नेदरलँडमध्ये भरली ‘माझी शाळा’


Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
Tweet : @chaitralicMT

पुणे : राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना परदेशात राहणाऱ्या लहान मुलांची मातृभाषेशी, संस्कृतीशी जोडलेली आपली नाळ तुटू नये यासाठी अॅमस्टरडॅममध्ये मराठी शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र मंडळ नेदरलँडस’तर्फे शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘माझी शाळा’ शाळेची सुरुवात करण्यात आली. या शाळेमध्ये मुलांवर मराठी भाषेशिवाय मराठमोळ्या परंपरांचे संस्कारही करण्यात येणार आहेत. ‘महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्स’तर्फे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सध्या तिथे दीडशे मराठी कुटुंबे वास्तव्यास आहेत. मंडळाच्या उपक्रमांचे महत्त्व मुलांना कळावे, मराठी वातावरणापासून दूर राहणाऱ्या या पिढीच्या मनात मातृभाषा रूजावी, या उद्देशाने शाळेची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विशेष म्हणजे मंडळातील उत्साही कार्यकर्तेच शिक्षकांची भूमिका बजावणार आहेत. शाळा दर रविवारी भरणार असून, मुलांना मराठी बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकविण्यात येणार आहे. मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत यासाठी त्यांच्याकडून पारंपरिक श्लोक, गाणी, पाढे पाठ करून घेणार आहोत,’ अशी माहिती समन्वयक पूर्वा कोरडे यांनी दिली.
शाळेची सुरुवात शिवजयंतीदिनी झाल्यामुळे पहिल्या दिवशी अमर आणि जयश्री वाडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली. सरस्वती पूजन आणि डॉ. अलकानंद राव यांच्या श्लोकपठणाने शाळेचा पहिला वर्ग भरला. पहिल्या दिवशी वीस मुले सहभागी झाली होती. प्रांजली कुलकर्णी यांनी मुलांना मराठीतील आकडे आणि स्वर यांची जुजबी ओळख करून दिली, असेही कोरडे म्हणाल्या.
मुलांना मराठी शिकविण्यासाठी पालकांकडून सातत्याने विचारणा करण्यात येत होती. यातूनच शाळेचा विचार पुढे आला आणि निशिकांत चौधरी यांनी नियोजन केले. मराठी शाळेमुळे मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मायदेशात गेल्यावर आजी आजोबांशी बोलताना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे, असे पराग आकरे आणि संजय कदम यांनी सांगितले.

महाराष्ट्र मंडळाचा ‘महाकट्टा’
सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंडळाने गेल्या महिन्यापासून महाकट्टा सुरू केला आहे. पहिल्या कट्ट्यावर ‘घर विकत घेताना’ या विषयावर आम्ही चर्चा केली होती. विशेष म्हणजे या भागातील सर्व भारतीय कुटुंबे सहभागी झाली होती. पुढील महिन्यात ‘घराची सुरक्षितता’ हा विषय निवडला आहे. गेल्या काही वर्षात तेथील भारतीय घरांमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. भारतीय महिला उत्तम प्रतीचे (कॅरेट) सोन्याचे दागिने वापरतात, हे सर्वज्ञात आहे. तेथील नागरिक साधारणतः बारा अथवा चौदा कॅरेटचे दागिने वापरतात, त्यामुळे चोर भारतीय घरांवर पाळत ठेवून सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चोऱ्या करतात. या वर मार्ग काढण्यासाठी आगामी कट्ट्यावर स्थानिक पोलिसांना मार्गदर्शनासाठी बोलावले आहे, अशी माहिती संजय कदम यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज