अ‍ॅपशहर

कवितेचे गाणे झाले अन् घडली संगीत साक्षरता

कविता...त्यातील शब्दांचा अर्थ...शब्दांना दिलेली चाल...त्यातून झालेला गाण्याचा जन्म...गाणे कसे गावे...विशिष्ट कवितांचे गाणे झाले तर काय होईल...अशा प्रक्रियेचीच जणू कविता झाली आणि त्यातून काव्यमय संगीत साक्षरता घडली. कविता निर्माण होणे, ती भेटणे, तीचे गाणे होणे, अशा‘कवितेचे गाणे होताना’च्या कलासक्त प्रवासाची रसिकांना अनुभूती मिळाली.

Maharashtra Times 28 Feb 2016, 3:00 am
डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिली कलासक्त प्रवासाची रसिकांना अनुभूती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mata maifal maharashtra times pune
कवितेचे गाणे झाले अन् घडली संगीत साक्षरता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कविता...त्यातील शब्दांचा अर्थ...शब्दांना दिलेली चाल...त्यातून झालेला गाण्याचा जन्म...गाणे कसे गावे...विशिष्ट कवितांचे गाणे झाले तर काय होईल...अशा प्रक्रियेचीच जणू कविता झाली आणि त्यातून काव्यमय संगीत साक्षरता घडली. कविता निर्माण होणे, ती भेटणे, तीचे गाणे होणे, अशा ‘कवितेचे गाणे होताना’च्या कलासक्त प्रवासाची रसिकांना अनुभूती मिळाली.
महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजित ‘मटा मैफली’मध्ये प्रसिद्ध संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी यांची ‘कवितेचे गाणे होताना’ ही मैफल शनिवारी रंगली. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये रम्य सायंकाळी रंगलेल्या या मैफलीने मटा मैफलीच्या पहिल्या दिवसाची सुरेल सांगता झाली. महाराष्ट्र टाइम्सचे सिद्धार्थ केळकर यांनी त्यांच्याशी सुरेल संवाद साधला. आदित्य आठल्ये यांनी तबल्यावर साथसंगत केली.
विविध कविता, गाणी यांच्या माध्यमातून हा सुरेल प्रवास रंगला. ‘गायक संगीतकारांनी रसिक म्हणून कविता वाचावी. कवितेमधील शब्दांच्या पलीकडचे काही दिसत असेल तरच शब्दांना चाल लावावी,’ असा सल्ला देऊन ‘संगीतकार कवितेच्या प्रेमात पडतच असतो, पण त्याचे वाचन असावे. कविता आपल्याला चोहो बाजूंनी भेटत असते, तो क्षण अवर्णनीय असतो,’ अशा शब्दांची गुंफण डॉ. कुलकर्णी यांनी केली.
आयुष्यात पहिल्यांदा कविता कधी भेटली, असे विचारल्यानंतर ‘आरत्यांमधून कविता भेटते,’ असे त्यांनी सांगितले. ‘आरत्या म्हणताना आपण ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या तीन मात्रेच्या दादऱ्यातील आरतीकडून थेट ‘घालीन लोटांगण, वंदिन चरण,’ या चार मात्रेतील प्रार्थनेकडे जातो, असे त्यांनी उदाहरणासह दाखवून दिले आणि प्रत्येकाकडे लय असते हे सिद्ध केले.
..
चाल देताना संगीतकाराला भान असले पाहिजे. कोणत्या कवितेच्या भानगडीत पडायला हवे, हे संगीतकाराला कळायला हवे. सगळी गाणी नाचण्यासाठी नसतात आणि प्रत्येक कवितेचा स्वभाव असतो.
- डॉ. सलील कुलकर्णी
..............
तेव्हा खऱ्या शांताबाई होत्या...
पूर्वी चांगल्या गाण्यांचा पर्याय होता. तेव्हा खऱ्या शांताबाई होत्या. सध्या ‘कल्लूळाचं पाणी,’‘शांताबाई,’‘आवाज वाढव डीजे’ या गाण्यांचा बोलबाला आहे. या गाण्यांमधून कोणताच अर्थ निघत नाही, असे मार्मिक विधान डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले. माझ्या लहानपणी काहींकडे मर्सिडीझ तर काहींकडे शेती होती. माझ्या घरी कुसुमाग्रज, शांता शेळके यांची पुस्तके होती. त्यामुळेच कवितेचा संस्कार झाला. शब्दांचा अर्थ समजण्यासाठी आणि कवितांची गाणी योग्य चालीत तयार करायला मदत झाली, असे सांगून ‘दूर कुठे तरी पाहाटतो सूर्य,’‘काळोखाचे मन,’‘उदासीस या कोणता रंग आहे, तुला ठाव नाही, मला ठाव नाही,’ ‘रात्र रात्र जागते, मी स्वत:स जाळते,’‘मी एक रात्री, त्या नक्षत्रांना पुसते,’अशा कविता आणि गाण्यांतून त्यांनी मैफलीत रंग भरले. कुसुमाग्रजांच्या ‘जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी,’या कवितेने मैफलीची सुरेल सांगता केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज