म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आपल्यातील संवेदनशील वृत्ती जागी ठेवून समाजातील वंचित, गरजू घटकांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गोष्टी पुरविण्यासाठी योगदान द्यायला हवे. इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आपल्या आयुष्यातील काही भाग समाजासाठी दिला पाहिजे. त्यासाठी आपल्यातील दातृत्व, त्यागभावना जोपासायला हवी. त्यातूनच समाजाचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष होईल,' असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
'टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शियम'तर्फे (टीएमसी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर 'टीएमसी'चे अध्यक्ष बाहरी मल्होत्रा, 'सिम्बायोसिस'चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सचिव डॉ. जयसिंग पाटील, मुकेश मल्होत्रा, अश्विनी मल्होत्रा, सिमरन जेठवानी, जेनीस सोमाजी आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, 'डीआयएटी'चे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायण, रोटरी क्लबचे प्रांतपाल रवी धोत्रे, बरुणकुमार खान, प्रा. राहुल कराड, डॉ. बी. के. मृत्युंजय, रजनीश कुमार, 'गिरीप्रेमी'चे उमेश झिरपे, गौतम बन्सल, सुरेंद्र पॉल सिंग आदींना विशेष सन्मानित करण्यात आले.
पाटील म्हणाले, 'उपाशीपोटी झोपणाऱ्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास जावेत, यासाठी खिचडी वाटपाचा सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. 'इस्कॉन'च्या मदतीने 'टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शियम'कडून रोज पाच हजार खिचडी पॅकेटचे वाटप होत आहे. दोन्ही हाताने देण्याची वृत्ती आपणही जोपासली पाहिजे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा कर्तबगार व्यक्तींना सन्मानित केल्याने इतरांसमोर आदर्श निर्माण होतो. अशा यशवंताकडून प्रेरणा घेऊन जिद्दीने काम करण्याची स्फूर्ती मिळते.' डॉ. जयसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले.