म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे देशभरातील विद्यापीठांमध्ये दहा कर्तृत्ववान महिलांच्या नावे अध्यासन सुरू केली जाणार असून, विविध विषयांशी संबंधित ही अध्यासने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) माध्यमातून स्थापन केली जाणार आहेत. या अध्यासनांसाठी 'यूजीसी'ने देशभरातील विद्यापीठांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले आहे.
सार्वजनिक धोरणे तयार करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व वाढवणे, अध्यासनाच्या क्षेत्रानुसार प्राध्यापकांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम तयार करून राबवणे, पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधनाच्या दृष्टीने विद्यापीठे, कॉलेजांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करणे, शोधनिबंध, अहवाल, चरित्र प्रसिद्ध करणे असा अध्यासन निर्मितीमागील उद्देश आहे. यासोबत आर्थिक मदतही करण्यात येणार आहे. या अध्यासनांसाठी इच्छुक असलेल्या विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवण्यात आले असून, त्यासाठी २७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यापीठांच्या प्रस्तावांची छाननी करून विद्यापीठांना अध्यासन दिले जाणार आहे, असे पत्रकात सांगण्यात आले आहे.
......
चौकट
गणित (लीलावती), विज्ञान (कमला सोहोनी), स्वातंत्र्यसैनिक (राणी गायदिनल्यू), संगीत आणि कला (मदुराई शानमुखावडिवू सुब्बुलक्ष्मी), कविता आणि गूढवाद (लल्लेश्वरी), वन्यजीव संवर्धन (अम्रिता देवी), प्रशासन (देवी अहल्याबाई होळकर), वैद्यकीय आणि आरोग्य (डॉ. आनंदीबाई जोशी), शिक्षण सुधारणा (हंसा मेहता), साहित्य (महादेवी वर्मा) अशी अध्यासन सुरू करण्यात येणार आहेत. या अध्यासनांच्या माध्यमातून संशोधनाला चालना मिळावी; तसेच शिक्षणाची नवी दालने खुली व्हावीत अशी संकल्पना आहे. विद्यापीठांना ही अध्यासन सुरू करण्यासाठी लागणारी मदत सरकारकडून करण्यात येणार आहे.