अ‍ॅपशहर

लायकी नसणाऱ्यांना महत्त्व नको

Maharashtra Times 3 Oct 2016, 4:28 am
नाना पाटेकरांचा सलमानवर अप्रत्यक्षपणे हल्ला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nana patekar slams salma khan
लायकी नसणाऱ्यांना महत्त्व नको


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशापुढे आमची किंमत शून्य असून, कलाकार देशाच्या तुलनेत काहीच नाहीत. जवान हेच या देशाचे खरे हीरो आहेत. सर्वप्रथम देश असून, त्यानंतर कलाकार येतात. त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका,’ या शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी सलमान खानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. ‘पाकिस्तानी कलाकारांना सलमानने व्हिसा दिलेला नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
उरी हल्ल्यानंतर अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. ‘पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नाहीत,’ असे वक्तव्य केल्यामुळे सलमानने अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर पाटेकर यांनी सलमानवर टीकास्त्र सोडले. एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
‘जवानांबद्दल कोणाला आदर वाटत नसेल, तर जनतेनेही त्यांचा आदर राखण्याची गरज नाही. ज्यांची लायकी नाही त्यांना आजिबात महत्त्व देऊ नये,’ या शब्दांत नाना यांनी सलमानला फटकारले. ‘सीमेवर युद्ध नसते; तेव्हा तेथे एकमेकांत बंधुभाव असतो. युद्ध सुरू झाल्यावर प्रतिस्पर्ध्यांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांना पुन्हा काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय सर्वस्वी सरकारचा असेल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
..
‘कलावंत, भारतीय हीच जात’

‘मला आजवर कोणी कधीही जात विचारली नाही आणि जात सांगण्याची माझ्यावर कधी वेळ आली नाही. कलावंत आणि भारतीय एवढीच माझी जात आहे. माझ्या कामावर जनतेने लायकीनुसार प्रेम केले आहे. म्हणून मला कधीही कोणतीही गोष्ट मागावीशी वाटली नाही. कोणत्या समाजाने काय करावे, यावर माझे काही म्हणणे नाही,’ असे सूचक वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज