अ‍ॅपशहर

वाक् देवता

बोलणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. वेद काळामध्ये लिहिले जात नव्हते किंबहुना पाठांतर आणि ठरल्या पद्धतीने ऋचा म्हणणे, हेच मान्य होते. तसेच घडत होते. अशा काळामध्ये बोलणे आणि त्या बोलण्याला कारक असलेली वाक् शक्ती महत्त्वाची ठरणारच होती.

Maharashtra Times 26 Sep 2017, 3:00 am
पुणे : बोलणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. वेद काळामध्ये लिहिले जात नव्हते किंबहुना पाठांतर आणि ठरल्या पद्धतीने ऋचा म्हणणे, हेच मान्य होते. तसेच घडत होते. अशा काळामध्ये बोलणे आणि त्या बोलण्याला कारक असलेली वाक् शक्ती महत्त्वाची ठरणारच होती. वेद काळानंतर बरेच बदल घडले आहेत. आज आपण नव्या युगात आहोत. असे असले, तरी बोलण्याचे, व्यक्त केलेल्या शब्दांचे महत्त्व आजही कमी नाही. ‘शब्द हे शस्त्र आहे,’ हे आपण अनेक ठिकाणी अनेकदा वाचत असतो, ऐकत असतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navratri column one
वाक् देवता


या बोलण्याची ताकद आपल्या पूर्वसुरींनी जाणली आणि ऋग्वेदाने वाक् शक्तीला देवतारूप दिले. तिची देवी म्हणून प्रार्थना केली. वाक् ही द्रष्ट्यांना ज्ञान देते, ती वेदांची जननी आहे, सारे जग तिच्यामध्ये सामावले आहे, असे ऐतरेय आरण्यक म्हणते. अथर्व वेदाने तिला जगन्माताच मानले आहे. जगाची निर्मिती करण्यासाठी प्रजापतीने वाक् देवीशी एकरूपता साधली, असे ते म्हणतात. वाक् ही कामधेनू आहे, असेही वर्णन आढळते. पद्मपुराणानुसार वाक् ही दक्षाची मुलगी आहे. दक्ष हा यमनियमांचे पालन करणारा आणि समाजात ते पालन होते की नाही, हे पाहणारा आहे. त्यानुसार वाक् ही त्याची मुलगी आहे, हे म्हणणे योग्यच ठरते. पुढे पद्मपुराण सांगते, की ती गंधर्वांची माता आहे. अप्सराही तिच्यापासूनच जन्मतात.

थोडक्यात सांगायचे, तर साऱ्या कला आणि समाजाचे चलनवलन या वाक् शक्तीमुळे घडते. गंधर्व आणि अप्सरा हे मुख्यतः गायन या कलेशी संबंधित. त्यामुळे त्यांच्यासाठी वाक् माताच आहे. आपण सारेही विविध प्रकारचे नाद करत असतो, ऐकत असतो. या साऱ्या नादांची कारक असणारी वाक् ही खरेच महत्त्वाची शक्ती. या शक्तीची प्रचिती आपल्याला पदोपदी येत असते. मुळात वाक् ही शक्ती मानणे आणि तिची देवी स्वरूपात आराधना करणे, यामध्ये सात्विकतेचा वास आहे. मंगलाचे गायन आहे. ज्या क्षणी बोलणे हे पवित्र कर्म मानले जाते, त्याला देवत्व येते, त्या क्षणी ती व्यक्ती देवीच्या कृपाशीर्वादाला प्राप्त होते. या देवतेचे सामर्थ्य जाणणे, त्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करणे, यातच या देवतेची उपासना आहे. वाचासिद्धी म्हणजे वेगळे काय आहे. बोलण्याचे पावित्र्य जाणून त्याची पूजा मांडली, की वाचासिद्धी प्राप्त होते. त्यामध्ये अट असते पावित्र्य राखण्याची, म्हणजे कायम सत्याचाच उच्चार करण्याची, शब्दांचे मोल जाणण्याची. ते मोल जाणले, की वाक् देवीचा उदोकार होतो. बोलण्यालाही देवत्व देणाऱ्या, त्या शक्तीचे मोल जाणणाऱ्या आणि तिला शक्तीस्वरूप देणाऱ्या पूर्वसुरींचे द्रष्टेपण आणखी वेगळे सांगायला नको.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज