अ‍ॅपशहर

फडणवीसांसोबत हवापाण्याच्या गप्पा मारल्या: अजित पवार

महाराष्ट्राला २३ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे शपथविधी उरकून धक्का दिलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी राजकीय सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले. त्यांच्यात यावेळी २० मिनिटं चर्चाही झाली त्यामुळे अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या! पण या भेटीत 'आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारत होतो,' असं मिश्किल उत्तर अजित पवार यांनी दिलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2019, 12:00 pm
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit-pawar-fadnavis
बारामती:
महाराष्ट्राला २३ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे शपथविधी उरकून धक्का दिलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी राजकीय सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले. त्यांच्यात यावेळी २० मिनिटं चर्चाही झाली त्यामुळे अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या! पण या भेटीत 'आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारत होतो,' असं मिश्किल उत्तर अजित पवार यांनी दिलं.

या भेटीचं निमित्त होतं अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचं लग्न. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिंदे यांचा मुलगा यशवंत शिंदे यांचं शनिवारी सोलापुरात थाटामाटात लग्न पार पडलं. या लग्नाला राजकीय क्षेत्रातीन अनेत नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सोफ्यावर शेजारी शेजारी बसून निवांत बोलत होते.

लग्न पार पडले आणि अजित पवार पुण्याकडे तर फडणवीस मुंबईकडे रवाना झाले. पण या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. यावर अजित पवारांना प्रसारमाध्यमांनी विचोरलं असता ते म्हणाले, 'संजयच्या मुलाचं लग्न होतं. त्यांनी मला जरा आग्रह करून बोलावलं तसं इतर नेत्यांनाही बोलावलं होतं. लग्न समारंभात खुर्च्या अशा मांडल्या की माझी आणि फडणवीस यांची खुर्ची शेजारी शेजारी आली. शेजारी बसलो म्हणजे लगेच काही सुरू झालं असं समजण्याचं कारण नाही. शेजारी बसून आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारत होतो.'

पत्रकारांनी मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबत विचारले असता, 'खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. या महाआघाडीचे प्रमुख नेते सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच खातेवाटपाबाबतचा निर्णय घेतील,' असे पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवारच म्हणाले होते, मी काकांशी बोललोय: फडणवीस

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत फडणवीस यांच्यासोबत थेट राजभवन गाठलं होतं. राज्यात सुरु असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांच्या गाडीला यामुळे अचानक करकचून ब्रेक लागला होता आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंपच झाला होता. यानंतर पवार-फडणवीस समोरासमोर आल्यानं या भेटीची चर्चा झाली.

'अजितदादांच्या उपमुख्यमंत्रिपदास विरोध नाही'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज