अ‍ॅपशहर

'खरंच काम करायचंय की नाही, हे त्यांना विचारा...'; मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

Pune Ncp News : शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून जमणार नाही. आज शेतकरी उद्विग्न झाला असून राज्य सरकारने त्यांची परीक्षा पाहू नये, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2022, 12:41 pm
पुणे : 'राज्यात सध्या ओला दुष्काळ आणि पूर परिस्थितीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह सर्वत्रच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, संकटाच्या काळात राज्यातील सरकारचे अस्तित्वच कुठे दिसत नाही,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. एका कार्यक्रमासाठी मुंडे पुण्यात आले असता, माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pankaja munde dhanajay munde 1
पंकजा मुंडे - धनंजय मुंडे


'शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संकटकाळात राज्यात फिरत नाहीत, असा तुमचा आरोप आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून त्यात भाजपकडून पंकजा मुंडे यांनाही संधी दिली जाऊ शकतो. तर अशी संधी मिळाल्यास त्या राज्यात फिरतील का,' असा प्रश्न धनंजय मुंडे यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, याआधीही पंकजा मुंडे या मंत्रिमंडळात होत्या. आता पुन्हा संधी मिळाल्यास त्या राज्यात फिरतील की नाही आणि त्यांना खरंच काम करायचंय का, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा.

भाजपला धक्का देत माजी आमदाराचा मुलगा थेट 'मातोश्री'वर; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन

'शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून जमणार नाही'

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीच्या झालेल्या नुकसानाबाबत त्यांना विचारले असता, धनंजय मुंडे म्हणाले, 'अतिपावसामुळे उस पीक सोडता शेतकऱ्यांच्या हाती कोणतेही पीक लागलेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारने मंत्री मंडळाचा विस्तार उशिरा केला. पालकमंत्र्यांची घोषणा उशिरा केली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कोणतीही पीक विमा कंपनी शेतकऱ्याला दिलासा द्यायला तयार नाही. अनेक ठिकाणी ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, तेथे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत.'

अनिल बोंडे म्हणाले, 'रा 'पासून रावण होतो, काँग्रेसचे नेते म्हणाले, 'न' पासून नराधम आणि 'अ' पासून अमानुष

'पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अशी आमची मागणी आहे. त्याचे पंचनामे, बाकी सर्व गोष्टी नंतर करता येतील. महाविकास आघाडीचे सरकारने गेल्या वर्षी अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान दिले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सोयाबिन पिकासाठी पीक विम्याची रक्कम आगाऊ देण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारने ही भूमिका घेणे गरजेचं आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून जमणार नाही. आज शेतकरी उद्विग्न झाला असून राज्य सरकारने त्यांची परीक्षा पाहू नये,' असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज