अ‍ॅपशहर

"वसंतभाऊ मला म्हणाला होतात, तू राजकीय आत्महत्या केली, आता पक्षाने तुमची हत्या केली की!"

रुपाली पाटील यांनी वसंत मोरे यांची बाजू घेतली खरी पण यावेळी त्यांनी वसंत मोरे यांच्या जुन्या वक्तव्याची त्यांना आठवण करुन दिली. 'मी मनसेतून राष्ट्रवादीत येताना तुम्ही म्हणाला होतात, तुझी राजकीय आत्महत्या असेल, पण वसंत भाऊ आता तुमची पक्षाने तर हत्या केली की.....!' , असं म्हणत रुपाली पाटलांनी वसंत मोरे यांना डिवचलं. तसंच बहिण म्हणून तुमच्या पाठीमागे नेहमीच उभी असेल, असा आधारही दिला.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2022, 4:11 pm
पुणे : मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मोठा दणका दिलाय. मशिदीवरील भोंग्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेला विरोध केलेल्या वसंत तात्यांना राज ठाकरेंनी पदावरुन बाजूला केलंय. आश्चर्य म्हणजे वसंत मोरे यांच्या भूमिकेला अनुकूल भूमिका घेतलेल्या साईनाथ बाबर यांच्याकडे राज ठाकरे यांनी पुणे शहराची धुरा सोपवलीय. मनसेच्या या सगळ्या अंतर्गत खेळीवर नुकत्याच मनसेतून राष्ट्रवादीत गेलेल्या रुपाली पाटलांनी (Rupali Patil) संताप व्यक्त केलाय. या सगळ्या प्रकरणात रुपाली पाटील यांनी वसंत मोरे यांची बाजू घेतली खरी पण यावेळी त्यांनी वसंत मोरे यांच्या जुन्या वक्तव्याची त्यांना आठवण करुन दिलीय. 'मी मनसेतून राष्ट्रवादीत येताना तुम्ही म्हणाला होतात, तुझी राजकीय आत्महत्या असेल, पण वसंत भाऊ आता तुमची पक्षाने तर हत्या केली की.....!' , असं म्हणत रुपाली पाटलांनी वसंत मोरे यांना डिवचलं. तसंच बहिण म्हणून तुमच्या पाठीमागे नेहमीच उभी असेल, असा आधारही दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rupali patil And Vasant more
वसंत मोरे आणि रुपाली पाटील


'पक्षाने तुमची हत्या केली की!'

"वसंत मोरे यांना पदावरुन हटवलं जाणं हे निश्चित अन्यायकारक आहे. काम करणाऱ्या माणसाला पदावरुन बाजूला सारणं हे मनसेतील अंतर्गत राजकारण आहे. पण मला मागील प्रसंगाची आठवण येते. ज्यावेळी मी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी वसंत भाऊंनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना, ही माझी राजकीय आत्महत्या असेल, असं म्हटलं. आता मला वसंत भाऊंची तीच प्रतिक्रिया आठवली. आता मनसेने तर भाऊंची राजकीय हत्या केली की...", असं रुपाली पाटील म्हणाल्या.

वसंत मोरेंचं काम १ नंबर, त्यांच्या भूमिकेतही दम

मनसेच्या अंतर्गत राजकारणातून वसंत मोरे यांना पदावरुन दूर सारण्यात आल्याचा संशय रुपाली पाटील यांनी व्यक्त केलाय. वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या भूमिका या जनसामान्यांच्या असतात, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांच्या कामाला तोड नाही, असं म्हणत रुपाली पाटलांनी वसंत मोरेंचं तोंडभरुन कौतुक केलंय. दुसरीकडे त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांना मात्र, माणसांमध्ये जाऊन पक्ष वाढवून दाखवा, असं चॅलेंजही केलंय.

मनसेत अंतर्गत राजकारणाला ऊत, त्यामुळेच मी मनसेला सोडचिठ्ठी दिली

मनसे पक्षात अंतर्गत राजकारण खूप आहे. याच अंतर्गत राजकारणाला कंटाळून मी पक्षाचा राजीनामा दिला. वसंत मोरे यांच्यावर केलेल्या कारवाईचं मला वाईट वाटलं. पण साईनाथ बाबर यांच्यावर पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीचं मला आश्चर्य वाटलं कारण वसंत मोरे यांना अनुकूल असलेलीच भूमिका साईनाथ बाबरने घेतली होती मग, एकाला हटवलं, दुसऱ्याकडे पद दिलं, हे असं का?, असा सवालही रुपाली पाटील यांनी उपस्थित केला.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज