म. टा. प्रतिनिधी, पुणे
कालवा कशाने फुटला याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या स्पष्टीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केल्याने त्यांच्या विधानाची खिल्ली उडवित राष्ट्रवादीने शहरातील विविध चौकात फ्लेक्स लावले आहेत. 'उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे पुण्याचा कालवा फुटला, वेड्याचा बाजार, पेढ्यांचा पाऊस' असा मजकूर यावर लिहिला आहे. हे फ्लेक्स शहरातील चर्चेचा विषय ठरले आहेत. स्वारगेट येथील जेधे चौक, जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौक, तसेच टिळक चौक (अलका टॉकीज) येथे हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
चार दिवसांपूर्वी दांडेकर पूल येथील कालवा फुटल्याने सुमारे पाचशेहून अधिक घरांचे नुकसान झाले. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी घटनास्थळी भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देखील या वेळी देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही शुक्रवारी या भागाला भेट देऊन येथील परिस्थीतीचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना, उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच शनिवारी सकाळी शहरातील विविध चौकात ही फ्लेक्सबाजी पाहायला मिळली. संपूर्ण दिवस 'राष्ट्रवादी'ने लावलेल्या या फ्लेक्सची चर्चा शहरात ऐकायला मिळत होती.
दरम्यान, सविस्तर अहवाल येण्यापूर्वीच जलसंपदा मंत्र्यांनी अशा पद्धतीने केलेले विधान दुर्दैवी असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी केली. महाजन यांनी केलेले विधान दुर्घटनाग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राज्य सरकराने दुर्घटनाग्रस्तांना पूर्ण भरपाई द्यावी, यासाठी जलसंपदामंत्र्यानी प्रयत्नशील रहावे, असेही छाजेड म्हणाले.