म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्वातंत्र्यलढ्यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरुणाई मात्र, डीजे, सोशल मीडियावर रमते आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी सकारात्मक तरुणाईची गरज असून त्यासाठी ग्रामविकास व कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा,' असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
गणितज्ज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. 'लोकसहभागातून ग्रामविकास' या विषयावर पवार यांनी मार्गदर्शन केले. समितीचे विश्वस्त व माजी पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, विश्वस्त तुषार रंजनकर, माजी विद्यार्थी हरीश बुटले, चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
'विद्यार्थ्यांनी पाण्याचा ताळेबंद शिकावा. पाण्याचा ताळेबंद मांडल्यानेच हिवरेबाजारचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. सध्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. हे थांबवण्यासाठी तरुणांनी खेड्यातील उपलब्ध साधनांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा,' असे पवार म्हणाले. गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ऋतुजा धावडे हिने आभार मानले.