म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मी विपुल लेखन केले; पण एकदा निवडणूक लढविण्याची चूक केली. नेते आपली घरे भरतात. मला मात्र माझे घर विकावे लागले. निवडणुकीतील अनुभवावर मी नाटक लिहिले. पुढे संपूर्ण लक्ष केवळ लेखनावर केंद्रित केले. लेखकाने नुसते लिहिणे महत्त्वाचे नाही; तर त्याने लेखनातून समतेचा, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार पेरत राहिला पाहिजे,' अशा शब्दांत लेखक प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी आठवणींना उजाळा देऊन लेखकाच्या कर्तव्यावर बोट ठेवले.
साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने सोनग्रा यांना 'साहित्यदीप पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा विधानसभेचे उपसभापती शंभू बांदेकर, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, संस्थेच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित होते.
'संत कबीरांच्या दोह्यावर मी पुस्तक लिहिले. संत कबीरांचा विचार देशासाठीच नव्हे; तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अलीकडे पुरस्काराचे कारखाने निघाले आहेत. परंतु 'साहित्यदीप'चा हा पुरस्कार स्वीकारताना मला मनस्वी आनंद झाला,' अशी भावना सोनग्रा यांनी व्यक्त केली.
सप्तर्षी यांनी 'मी आणि सोनग्रा वर्गमित्रच नव्हे; तर एका बाकावरचे मित्र आहोत,' असे सांगून मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
आढाव म्हणाले, 'सोनग्रा यांनी संत कबीरांचे दोहे मराठीत आणल्यामुळे मराठी भाषिकांना कबीर समजून घेणे सोपे जाणार आहे. कबीर बहिष्कृत संत होते. हिंदू आणि मुस्लिम त्यांना स्वीकारत नव्हते. कबीरांनी लिहिलेले दोहे संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहेत.'
सोनग्रा यांच्या साहित्यावर आधारित 'सोनजातक' या कार्यक्रमात स्वाती सामक, धनंजय तडवळकर, माधव हुंडेकर, निरुपमा महाजन, अन्वी आठलेकर आणि कविता क्षीरसागर यांनी संहितेचे अभिवाचन केले. चंचल काळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला कवी विजय शेंडगे, स्नेहसुधा कुलकर्णी, माधुरी गयावळ, अनिल आठलेकर, सोनग्रा यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
-------------