म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुठे स्वच्छता नाही, तर कुठे पाणीच नाही. कुठे कँटीनची वानवा, तर कुठे प्यायच्या पाण्याची बोंब, कुठे पावसाच्या गळणाऱ्या पाण्यामुळे कलादालनात बादल्या लावाव्या लागतात, तर कुठे पुराचे पाणी ओसरून महिना झाला तरी संपूर्ण वास्तूच बंद आहे... पुण्यातील वेगवेगळ्या नाट्यगृहांमधील या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या नाट्यगृहांच्या समस्यांनी तोंड वर काढल्याने पुन्हा एकदा महापालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांची नाट्यगृहांविषयीची उदासीनता समोर आली आहे.
पुण्यात दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक बालनाट्ये, तसेच व्यावसायिक नाटकांचे प्रयोग रंगतात. विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असते. यंदाही पुण्यातील बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गणेश कला क्रीडा रंगमंच आणि इतर काही सभागृहांमध्ये कार्यक्रम होत आहेत. परंतु, या ठिकाणी पैसे देऊन येणाऱ्या रसिक प्रेक्षकांना मिळणाऱ्या सुविधांची अजूनही वानवा आहे. खाद्यपदार्थांपासून, पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत अनेक समस्यांना रसिकांना सामोरे जावे लागणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आजपासून शहरातील विविध नाट्यगृहांमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घेणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कलावंतांनी पुण्यातील नाट्यगृहांमधील गैरसोयींबाबत आवाज उठवला होता. त्यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासनही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. पण निवडणुका, प्रचार या धामधुमीत नाट्यगृहांची अवस्था पुन्हा एकदा 'जैसे थे' अशीच झाली आहे. पुण्यातील सांस्कृतिक संस्थांनी नाट्यगृहांमध्ये उद्भवणाऱ्या दुरुस्ती कामांसाठी विशेष निधी पालिकेने द्यावा, अशी मागणीही केली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
...
महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन नाट्यगृहांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. परंतु, निवडणुकांचे कारण देऊन प्रशासनाने या समस्यांकडे दुर्लक्ष केले. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर नाट्यगृहांमध्ये असलेल्या समस्या डोके वर काढणार असून, संयोजक आणि प्रेक्षकांना त्रास होणार आहे. सातारा रस्ता परिसरातील अण्णा भाऊ साठे सभागृह पुराचा फटका बसल्याने एक महिन्यासाठी बंद आहे. पूर ओसरल्यानंतर आतापर्यंत दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करणे अपेक्षित होते मात्र, तसे घडलेले नाही.
- सुनील महाजन, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखा