म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'मला टीमवर्कने काम करायचं आहे; मला 'इंडिया टॉप'ला न्यायचा आहे... माझा भाचा माझ्याकडे पबजी खेळायला आयफोन मागतो; पबजी महाराष्ट्रात बंद करा; लहानलहान पोरं बिघडली आहेत. मीसुद्धा रात्री १२ वाजेपर्यंत पबजी खेळायचो; पण तो आता बंद करा...!'
अशा पद्धतीची विसंगत विधाने करू लागलेल्या या तरुणाचे संतुलन ढळल्याची शंका आल्याने नागरिकांनी त्याला चाकण पोलिस ठाण्यात आणले. मात्र, या तरुणाने थेट पोलिसांसमोरच भाषणबाजी करीत 'पबजी'चे दुष्परिणाम सांगण्यास सुरुवात केली. अखेर, या तरुणाला पोलिसांनी वडिलांच्या ताब्यात दिले. हा २६ वर्षीय तरुण चाकण येथे एका कंपनीत काम करतो. आज सकाळपासून अचानक त्याच्या वागण्यात बदल झाला. तो वारंवार पबजी गेमबद्दल बोलू लागला. 'पबजी गेम कसा घातक आहे, या गेममुळे लहान मुले बिघडली आहेत,' असे सांगताच तो अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार अशा नेत्यांबाबत बोलू लागला. त्याच्या आवेशाने घाबरलेल्या नागरिकांनी त्याला पोलिस ठाण्यात आणले. चौकशीच्या वेळी त्याने भाषणबाजी सुरू केली. 'मी पबजी खेळत नाही. एकदाच खेळलो. १५ दिवस खेळलो, रात्र रात्र पबजी खेळत असायचो,' अशी विसंगत विधाने तो करू लागला. त्यानंतर, 'इंडिया टॉप'ला न्यायचा आहे, 'पबजी'सारखे टीमवर्क करायचे आहे, असे सांगून, त्याने राजकारणावरही चर्चा सुरू केली.
अखेर, महाराष्ट्रात पबजी बंद करा, मी पबजी हॅक करतो, असे तो सांगू लागला. हा प्रकार पाहून चाकण पोलिसांनी थेट या तरुणाच्या वडिलांना फोन लावून बोलावून घेतले. मात्र, पबजी खेळण्याचा परिणाम झाल्याने तो असा वागतो का, हे सांगता येणार नाही, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी सांगितले.