म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आघाडी पक्षाचे सरकार असताना मी विरोधी नेत्यांना सळो की पळो करून सोडले. सभागृह दणाणून सोडले. त्यावेळी माझ्यावर कोणतेही आरोप झाले नाही. आमचे सरकार आले आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या; पण त्यात काही आढळले नाही. आता नवीन आरोपांची वाट पाहतोय,’ अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षातील विरोधकांना घरचा आहेर दिला. त्यावेळी त्यांनी ‘बिनधास्त बोलण्याच्या तोटा झाला,’अशी कबुली दिली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त खडसे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी सद्यस्थितीबाबत त्यांनी भाष्य केले. या वेळी व्यासपीठावर जनता दलाचे (संयुक्त) मुख्य महासचिव व राष्ट्रीय प्रवक्ता के. सी. त्यागी अध्यक्षस्थानी होते. आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन. सी. जोशी, संतोष कुलकर्णी, सुरेश चव्हाणके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
‘चाळीस वर्षे मी राजकारणात आहे. आतापर्यंत कोणत्याही विरोधकांनी माझ्यावर आरोप केले नाहीत. अनेकवेळा सभागृह दणाणून सोडले आहे. पण सरकार आले आणि आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. आतापर्यंत ८० प्रकारचे आरोप झाले. माझी बायको दाऊदशी बोलल्याचा आरोप झाला. सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक, प्राप्तीकर विभाग आणि पोलिसांच्या चौकशा झाल्या. त्या चौकशीतून काही आढळले नाही. आता नव्या आरोपांची वाट पाहतोय,’ अशा शब्दांत पक्षातील विरोधकांना एकनाथ खडसे यांनी टोला लगावला. राजकीय जीवनात विविध पदे, मंत्रिपदे, विविध खाती सांभाळली. पैसे कमवायचे असते तर एखादे मेडिकल कॉलेज काढले असते. कोणाला किती आरोप करायचे ते करू द्या. आपण आपले प्रामाणिकपणे काम करायचे,’ असेही ते म्हणाले. ‘जीवनगौरव पुरस्कार मिळाला म्हणजे करिअर संपले नाही. ही तर आपल्या कामाची खरी पोचपावती आहे. आता नव्याने सुरुवात झाली आहे,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या भारताची धर्मशाळा झाली आहे. कोणीही देशात येतो. राहतो आणि येथेच बॉम्बस्फोट घडवितो. बाहेरील पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमधून अनेक जण येतात. त्यांना नागरिकत्व दिले जाते. तेच लोक वाईट कृत्य करतात. अशा व्यक्तींना देशाबाहेर काढले पाहिजे. सिमीसारख्या संघटनांविरोधात आपणच सर्वप्रथम आवाज उठविल्याची आठवण खडसे यांनी बोलून दाखविली. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात खूप फरक आहे, असेही ते म्हणाले.
‘पूर्वी बिनधास्त बोलले तरी अडचण नव्हती. आता बिनधास्त बोलताना काळजी घ्यावी लागते. त्यावेळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजप सरकार सत्तेत आले. आजच्या भाजपाची ओळख ही त्यांची पुण्याई आहे. आज मुंडे असते तर राज्याच्या राजकारणाची दिशी बदलली असती,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मंत्रिपदाला लाथ मारतो
आरोपांच्या फैरींबाबत माध्यमांमध्ये खडसे यांच्याबाबत लिहिले अथवा चॅनेलवर दाखविले जात होते. त्याचा संदर्भ भाषणात दिला. ‘काहीही संबंध नसताना सतत दोन महिने माझ्यावर काही तरी दाखविले जात हते. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट असा काळ होता. अशी वेळ कोणावरही येऊ नये. आयुष्यात परिश्रम केले, चारित्र्य जपले. त्याच्यावर आक्षेप घेणे मरणापेक्षा मरण आहे. काय करायचे असले मंत्रिपद? असल्या मंत्रिपदाला लाथ मारतो. यापुढे सरकारमध्ये असेल किंवा नसेलही. परंतु, अशा स्वरूपाच्या प्रवृतींना साथ देणे चुकीचे आहे,’ असा त्यांनी सल्ला दिला.