म. टा. प्रतिनिधी, पुणे
'विद्यार्थी शिक्षकांचा खून करतात, कारण समाजात मूल्यांचा अभाव आहे. विशिष्ट टप्प्यावर जे ज्ञान मिळायला हवे, ते लवकर मिळत असल्याने मुले लवकर वयात येत आहेत. त्यातूनच हिंसेचे प्रमाण वाढत आहे. माणसातील पशूप्रवृत्ती जिवंत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. शाळेत मूल्ये शिकवली जात नसून केवळ पाठ्यपुस्तके शिकवली जात असल्याने मुलांमधील निरागसता कशी जपायची, हा सामाजिक गंभीर प्रश्न झाला आहे,' अशा शब्दांत साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोमवारी महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
बालक संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अभिनेते राहुल सोलापूरकर प्रमुख पाहुणे होते. संस्थेचे प्रमुख सल्लागार मा. बा. पारसनीस, कार्याध्यक्ष धनंजय ओक, उपकार्याध्यक्ष शिरीष जोशी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 'सेतू' स्मरणिकेचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. विविध व्यक्ती आणि शाळा यांचा सत्कार करण्यात आला.
'मुलांवर संस्काराची आज अधिक गरज निर्माण झाली आहे. कायदा असला तरी वंचित घटकातील मुलांना शिक्षण मिळतेच असे नाही. या वर्गातील मुलांकडे पालकांचे लक्ष नाही आणि शिक्षण नाही. यामुळे त्यांच्यावर संस्कार कोण करणार हा प्रश्न आहे. वाईट मार्गाने मोठी झालेली अनेक माणसे त्यांच्यासमोर आहेत. त्यांचे ते आदर्श होऊ न देता आपण त्यांच्यापर्यंत मूल्ये कसे पोहचवतो आणि त्यांचे आयुष्य भरडण्यापासून कसे वाचवतो, हे आव्हान आहे,' यावर देशमुख यांनी बोट ठेवले. 'दुर्बल घटकातील मुलांच्या मनात व्यवस्थेविरोधात राग आहे. मोबाइल, इंटरनेट यामुळे मुले अकाली प्रौढ होत आहेत. त्यांचे वयात येणे घातक आहे,' याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.
सोलापूरकर म्हणाले, 'आमच्या पिढीने देशाला ओरबाडले आहे. आधीच्या पिढीचा संस्कार आम्ही विसरलो असताना पुढच्या पिढीला काय देणार? आम्ही आपल्या चुकांवर बोट ठेवले पाहिजे. सिग्नल मोडणे, रस्त्यात थुंकणे असे संस्कार पुढील पिढीसमोर ठेवणार आहोत का, याचा विचार केला पाहिजे. डोके बाजूला ठेवून जगणे बंद झाले पाहिजे.'
-----------
--------------