परभणी : गेल्या सहा दिवसांपासून परभणीत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. शनिवारी परभणीचे तापमान सुमारे ४४ अंश डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. सततच्या तापमानामुळे जमीन, इमारती तापल्या असून ज्यामुळे नागरिकांना सुमारे ४६ अंशापेक्षा जास्त उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे परभणीकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार २० मे पासून परभणी तापलेलीच आहे. या तापमानात वाढ होत जाऊन काल शुक्रवारी सुमारे ४५ अंशावर पोहचले होते. तर शनिवारी देखील उष्णतेची तीव्रता कायम राहिली. तापमानात ४३.५ अंश इतकी घट झाली तरी तापलेल्या जमिनी आणि इमारतींमुळे वातावरणातील उष्णता कमी होत नाही. अधिकच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या प्रचंड तापमानामुळे नागरिक सकाळी अकरा वाजल्यानंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत तर दिवसभराच्या उष्णतेमुळे संध्याकाळनंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. शहरात बाजारहटासाठी येणारी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. त्यासोबतच दुसरीकडे प्रचंड तापमानामुळे ताप, खोकल्यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. विशेषत: लहान मुलांना वाढत्या तापमानाचा सामना करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लहान मुलांना रूमाल बांधल्याशिवाय बाहेर पाठवू नये, अंगावर सैल आणि कॉटनचे कपडे घालावेत, तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी गॉगल्स वापरावेत. तसेच पाणीदार फळे टरबुज, अंगुर, खरबुज, काकडी शिवाय फळांचे ज्युस, सरबत आणि उसाचा रस नियमित सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत. दरम्यान, ही उष्णता आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो ओळी..
परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचा तापमान दर्शवणारा बोर्ड.