अ‍ॅपशहर

स्मशानभूमीतल धुरामुळं नागरिकांना श्वसनाचा त्रास; कोर्टात याचिका दाखल

शहरातील स्मशानभूमीतील चिमणीतून बाहेर पडणारा धूर आणि राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 12 May 2021, 10:44 am
म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहरातील स्मशानभूमीतील चिमणीतून बाहेर पडणारा धूर आणि राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. स्मशानभूमीतील अशास्त्रीय व्यवस्थापनाबद्दल याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आज (बुधवारी) या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम high court.


कोव्हिडमुळे शहरातील मृत्यूदरात मोठी वाढ झाली आहे. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारांचे प्रमाण दिवसाला शंभरपर्यंत पोहोचले आहे. येथील विद्युत वाहिनीवरील चिमणीतून गडद आणि जाड धूर बाहेर पडत आहे. धुराचा आणि राखेचा या परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. या विरोधात न्याय मिळविण्यासाठी नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी दाद मागितली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. अजित देशपांडे आणि अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांनी या प्रकरणी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

स्मशानभूमीतून बाहेर पडणारा हा धूर मानवी आरोग्यासाठी घातक आहे आणि त्याचा नकारात्मक परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर दिसून येतो आहे. नवी पेठ, सदाशिव पेठ, पर्वती पायथा, दांडेकर पूल वस्ती, फाटक बाग परिसर, रामबाग कॉलनी, लोकमान्यनगर, विजयानगर कॉलनी, दत्तवाडी गावठाण, सारसबागेपर्यंत विषारी धूर आणि घातक राख पसरत असल्याची तक्रार याचिकेत मांडण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्या. गिरीश कुळकर्णी यांच्यासमोर आज (बुधवारी) या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महापालिकेला यापूर्वीच स्मशानभूमीतील यंत्रणेबद्दल योग्य उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. महापालिका ते पूर्ण करण्यास अपयशी ठरली आहे. चिमणी आणि इतर इलेक्ट्रिकल, गॅस चेंबर्समधून धूर सोडण्याचे व्यवस्थापन करण्याची आणि चिमणीची उंची वाढविण्याची गरज आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार दर तीन महिन्यांनी स्मशानभूमीतील व्यवस्थापनाचा शास्त्रीय अहवाल प्रसिद्ध करणे, स्मशानभूमीच्या शेजारील रहिवासी भागात वायू प्रदूषण मीटर बसविणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील मोजमाप आकडेवारी जाहीर करणे गरजेचे आहे.

- अॅड. असीम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील

परिसरातील लोकसंख्येत वाढ

नवी पेठेतील स्मशानभूमी १९८० मध्ये सुरू झाली. तेव्हाची आणि आताची परिस्थिती बदलली आहे. या स्मशानभूमीलगत राहणाऱ्यांची संख्या साठ हजारापर्यंत गेली आहे. स्मशानभूमीमध्ये दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असल्याने धुराचे प्रमाण काही पटींनी वाढले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे.

इतर ठिकाणीही हीच परिस्थिती

हडपसर भागात महापालिकेच्या सहा स्मशानभूमी आहेत. धनकवडी, कात्रज, येरवडा आणि कैलास येथील स्मशानभूमीमध्ये बसवलेली यंत्रे योग्यप्रकारे काम करत नाहीत. वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या निकषांचे तिथे पालन होत नाही. या यंत्रांच्या आणि चिमणीच्या धुरामुळे या भागातील नागरिकांना श्वसनासही त्रास होतो आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज