म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कविता आत्मनिष्ठ असली, तरी ती वैयक्तिक नसते. कवितेतून मानवी भावभावनांचे आविष्करण होते. संवेदनाक्षम मनाला या अनुभवांची भुरळ पडते आणि त्यातून कवितेचा जन्म होतो. कविता ही एकाच वेळी वैयक्तिक आणि सार्वत्रिक असते,' असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रकाशनातर्फे प्रसिद्ध कवी भालचंद्र कुलकर्णी लिखित 'जिव्हार' या कवितासंग्रहाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कवी उद्धव कानडे, लेखक व कवी विश्वास वसेकर, चित्रकार श्रीधर अंभोरे, कवी भालचंद्र कुलकर्णी आणि संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सुनीताराजे पवार उपस्थित होते.
वसेकर म्हणाले, 'कविता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अनुभवाच्या कक्षेतून वेगवेगळे अर्थ प्रक्षेपित करत असते. प्रत्येक कवितेच्या छटा वेगवेगळ्या असतात. बालकवींची 'औदुंबर' ही कविता आज वाचली, तर वेगवेगळे अर्थ निघतात. साहित्यातील कथा, एकांकिका, कादंबरी हे प्रकार अभ्यासांती आणि निरीक्षणातून हाताळता येणे शक्य होते. मात्र, कविता ही स्फुरावीच लागते. इतर साहित्य प्रकार अनुभवांचे विश्लेषण असते, तर कविता अनुभवांचे संश्लेषण असते. संश्लेषणाच्या या प्रक्रियेतूनच कविता जन्माला येते.'
संस्कृती प्रकाशनातर्फे देशमुख व पवार यांच्या हस्ते ॲड. सुदीप महेश केंजळकर यांना गौरविण्यात आले.
मराठी साहित्याला चित्रकार आणि कवींची मोठी परंपरा लाभली आहे. चित्रकार कॅनव्हासवर रंगांची उधळण करून, रसिकांना आनंद देण्याचे काम करतो; तसेच कवी शब्दांचे रंग उधळून, कवितेच्या माध्यमातून रसिकांना आनंद देत असतात. शब्दांना रंगछटा देण्याचे महत्त्वपूर्ण काम चित्रकार कवी करतो.
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष