म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आम आदमी पक्षाने कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडण्यासाठी दिल्ली आणि हरियाणातील फॉर्म्युला वापरण्यास सुरुवात केली आहे. या फॉर्म्युल्यानुसार, आपतर्फे पोस्टर आणि मिस कॉल मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत 'आप'ने गेल्या दोन महिन्यांत पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ठिकठिकाणी तब्बल ३० हजार पोस्टर्स लावली आहेत. या पोस्टरवरील संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून 'आप'मध्ये काम करण्यास इच्छुक नागरिकांशी संपर्क केला जात आहे.
आम आदमी पक्षाने राज्यात १२पेक्षा अधिक राजकीय पक्षांना एकत्र करून समृद्ध महाराष्ट्र आघाडी स्थापन केली असून, त्यामार्फत पुणे, मुंबईसह भिवंडी, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर अशा १० जागा लढवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत चार वर्षांत केलेल्या कामगिरीच्या जोरावर ही निवडणूक लढविण्याचा पक्षाचा मानस आहे. त्या दृष्टीने पुण्यासह काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करून आपच्या संसदीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत. पुण्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ला २८ हजार मते मिळाली होती. या मतदारांना पक्षाशी बांधून ठेवण्यासाठी यंदाच्या निवडणुकीतही पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी 'आप'ने सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी पक्षाकडे कार्यकर्त्यांची उणीव भासत आहे. त्यासाठी पक्षाने दिल्ली आणि हरियाणातील कार्यकर्ता जोडण्याचा पोस्टर-मिस कॉल मोहीम फॉर्म्युला वापरण्यास सुरुवात केली आहे.
'आपच्या हरियाणा शाखेने राज्यभरात पावणेदोन लाख पोस्टर लावून त्यावरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले होते. त्याद्वारे चार महिन्यात पक्षाकडे आलेल्या एक लाख १५ हजार मिसकॉलच्या माध्यमातून ४० हजार तरुण 'आप'मध्ये सक्रिय झाले होते. त्याच धर्तीवर पुण्यासह राज्यभरात गेल्या दोन महिन्यात ३० हजार पोस्टर लावण्यात आले आहेत. त्या माध्यमातून साडेआठ हजाराहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यात कार्यकर्त्यांचे स्वतंत्र पथक कार्यरत आहे,' अशी माहिती 'आप'च्या युवा आघाडीचे संयोजक अजिंक्य शिंदे यांनी सांगितले.