मोजक्याच देशांचा विक्रम
प्रमोद काळे
जगातील मोजक्याच देशांनी चंद्रावर जाण्याची मजल मारली आहे. या देशांच्या नावांमध्ये आता भारताचे नावही जोडले जाणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-१ मोहिमेनंतर आता चांद्रयान-२ मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत जाण्याची कामगिरी केली आहे. ही कामगिरी करणारा भारत पहिलाच देश बनला आहे. चांद्रयान-१मध्येही आपण चांगली कामगिरी केली. त्यामुळेच आपल्याला चंद्राजवळ जाता आले. आता चांद्रयान-२ मोहिमेतून आपण संसोधनाचा पुढचा पल्ला गाठणार आहोत. त्यामुळे चांद्रयान-२ ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम असून, या मोहिमेतील यानाचा लँडर शनिवारी पहाटे उतरणार आहे. त्याच्या आत बसवलेल्या रोव्हरच्या माध्यमातून आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागावरील हालचाली टिपण्यास मदत होणार आहे. वातारणात होणारे बदल टिपण्यास मदत होणार आहे.
या सर्व प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या संपूर्ण मोहिमेमध्ये 'इस्रो'च्या वैज्ञानिकांचा खूप मोठा वाटा आहे. त्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातून या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावण्यात आला आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होत आहे. चांद्रयान-१ मोहिमेतून आपण चंद्राच्या अगदी जवळ गेलो होतो. आता चांद्रयान-२ मोहिमेद्वारे त्यापुढील टप्पा गाठणार आहोत. चंद्राचा दक्षिण ध्रुव दूर अंतरावर असल्याने, तेथे सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे तेथील तापमानदेखील कमी असते. अशा तापमानामध्ये इन्स्ट्रुमेंट उत्तम पद्धतीने कार्य करतात. या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने चंद्रावरील पाणी शोधण्यासाठी मदत होणार आहे. अंतराळात पाणी असणे हीच मुळात मोठी बाब आहे. त्यामुळे चंद्रावर पाणी सापडल्यास तेथे भरपूर संशोधन करण्यासाठी वाव आहे. भविष्यात आपल्या देशाला चंद्रावर स्टेशन उभारायचे झाले, तरी तेथे पाण्याचा उपयोग होणार आहे. याशिवाय, चंद्रावरील सृष्टीबाबत संशोधन करायचे झाल्यास, ते करण्यासाठी फायदा होणार आहे. पुढील कोणत्याही प्रकारचे संशोधन चंद्राच्या पृष्ठभागावर करायचे झाल्यास त्याला वाव आहे. भविष्यातील मनुष्याच्या वास्तव्याबाबत संशोधन करता येईस. आतापर्यंत चांद्रयान-२ अंतर्गत जी मोहीम सुरू आहे, ती ठरविल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडत आहे, असेच दिसत आहे. या यशामुळे जगात 'इस्रो'चे वैज्ञानिक; तसेच संशोधनात्मकदृष्ट्या महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र, 'नासा'ची बरोबरी करण्यासाठी आपल्याला आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे. या संशोधनासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन करायला हवे.
(लेखक 'इस्रो'मधील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)