अ‍ॅपशहर

शाळा-कॉलेज ते यूपीएससी... एक्सायटिंग

प्रांजल पाटील

Maharashtra Times 22 May 2016, 3:00 am
शाळा-कॉलेज ते यूपीएससी... एक्सायटिंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pranjal patil upsc
शाळा-कॉलेज ते यूपीएससी... एक्सायटिंग


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘यूपीएससी’च नाही, तर उच्च शिक्षणाच्या पातळीवर आल्यावर मला अभ्यासासाठी सगळंच साहित्य ब्रेलमध्ये उपलब्ध होईल अशी खात्री नव्हती. त्यामुळे टेक्नोलॉजीच्या वापराशिवाय माझ्यासमोर पर्यायच नव्हता. स्क्रीन रीडर वापरून मी अभ्यास करत गेले. उल्हासनगरमधील शाळा-कॉलेज, दिल्लीतील जेएनयूमधील एम.ए. ते पीएचडी आणि आता यूपीएससी हा सगळाच प्रवास मला खूपच एक्सायटिंग वाटला...’ प्रांजल पाटील बोलत होत्या.
अंध असूनही यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) देशात ७७३ व्या आलेल्या प्रांजल यांचा पुणे आकाशवाणी केंद्राने शुक्रवारी विशेष सत्कार आयोजित केला होता. केंद्राचे उपमहानिदेशक आशिष भटनागर यांच्या हस्ते प्रांजल यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. केंद्रातर्फे या वेळी त्यांना रेडिओ संचही भेट देण्यात आला. या सत्कारानंतर आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये प्रांजल यांनी आपल्या ‘यूपीएससी’पर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा चढता आलेख सर्वांसमोर मांडला. प्रांजल यांचे आई- वडील आणि पतीही या वेळी उपस्थित होते.
प्रांजल म्हणाल्या, ‘राज्यशास्त्रामध्ये पदवी केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गाठले. त्यानंतर एम. फिल पूर्ण केल्यानंतर मी खऱ्या अर्थाने यूपीएससीची तयारी सुरू केली. परीक्षा दिल्यानंतर खरं तर मला पद मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र, माझ्यापेक्षा माझ्या मित्र- मैत्रिणींनाच माझ्यावर जास्त विश्वास होता. त्यामुळे माझे यश त्यांनीच साजरे केले.’
यूपीएससीचा अभ्यास आणि मुलाखतीच्या तयारीविषयी प्रांजल म्हणाल्या, ‘माझा एम. फिल-पीएचडीचा अभ्यास आणि यूपीएससीचा अभ्यास हा अगदी विरोधी प्रकारातील वाटला. संशोधनासाठी एकच विषय सखोल अभ्यासावा लागतो. यूपीएससीच्या बाबतीत तुम्हाला सर्वच बाबींची व्यवस्थित माहिती आणि आकलन आवश्यक असते. यूपीएससीच्या तयारीसाठी मी वृत्तपत्रांच्या नियमित वाचनाला महत्त्व दिले. एनसीईआरटीच्या सहावी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला. यापूर्वी शिकलेल्या या पाठ्यपुस्तकांमधील सर्व गोष्टी, पुन्हा नव्याने आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यासण्यात मला एक वेगळाच आनंद मिळाला.’
यूपीएससीची तयारी म्हटली की अंगावर काटा येणाऱ्या अनेकांसाठी प्रांजल यांची ही मुलाखत प्रेरणादायी ठरल्याने, त्यांच्यासारख्याच अनेकांनीही मुलाखतीनंतर टाळ्यांच्या गजरामध्ये प्रांजल यांचे कौतुक केले.
000
कुठेही गेले, तरी भारतातच असेन ना?...
मुलाखतीदरम्यान आकाशवाणीने उपस्थितांनाही प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी प्रांजल यांना, ‘तुम्हाला इतर राज्यात पोस्टिंग मिळाल्यास काय वाटेल,’ असा प्रश्न विचारला गेला. त्यावेळी प्रांजल यांनी या प्रश्नाला अगदी सहजतेने उत्तर देत, ‘कुठेही गेले, तरी भारतातच असेन ना,’ असा प्रतिप्रश्न केला; तसेच स्थानिकांच्या नेमक्या प्रश्नांची माहिती घेत, मिळेल ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचा निर्धारही व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज