म. टा. प्रतिनिधी, जालना
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकरी बियाणे, खते खरेदी करण्यासाठीच्या तयारीला लागले आहेत. करोना संसर्गाच्या साथीच्या आजाराचा ग्रामीण भागातील जनजीवनावर फारसा परिणाम दिसत नाही.
खरीप हंगामात जिल्ह्याचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ५.८९ लाख हेक्टर आहे. कापूस, सोयाबिन, मका आणि तूर ही प्रमुख पिके आहेत. एकूण ३६ हजार १९६ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सोयाबीन पाच हजार ७०० क्विंटल, संकरीत कापूस चार लाख ५० हजार पाकिटे, मका दोन हजार ४८ क्विंटल, बाजरी २१९ क्विंटल आणि मूग १२० क्विंटल बियाण्याची बाजारात उपलब्धता झाली असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
रासायनिक खतांचा एक लाख ६५ हजार १९० मेट्रिक टन कोटा मंजूर असून ८९ हजार ६५६ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. ४६ हजार ८२ मेट्रिक टन खताची विक्री शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रातून करण्यात आली. ४३ हजार ५७४ मेट्रिक टन खत साठा जिल्ह्यात शिल्लक आहे. खताची टंचाई नसल्याने बियाणांचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
भरारी पथकांची स्थापना
तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. बियाणे, रासायनिक खते, व किटकनाशके बाबत तक्रारीचे निराकरणे करण्यासाठी कृषी विभागामध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. केंद्रावरील गर्दी टाळण्याचे दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खते पुरवठा करण्याची मोहीम राबविली जात आहे, अशी माहिती कृषि विकास अधिकारी भीमराव रणदिवे आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.