म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असून, या भागाला मेक इन इंडियामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय करण्यास प्रथम प्राधान्य दिले जात आहे. आयुक्तालय झाल्यावर या परिसराला त्याचा फायदा होणार आहेच. परंतु, त्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांकडून येथील सुरक्षेव्यवस्थेबाबत कटिबद्ध आहेत, असे आश्वासन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले.
नांगरे-पाटील यांनी तळेगाव परिसरातील विविध खासगी कंपन्यांच्या प्रतिधिनिंशी सोमवारी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. तळेगाव येथे नुकतीच एक खुनाची घटना घडली होती. या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली होती. या पार्श्वभूमीवर नांगरे-पाटील यांनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांसह बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह तळेगाव एमआयडीसी, तळवडे, पौड येथील खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी, ‘एमआयडीसी’चे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात नवीन चार पोलिस आयुक्तालये होत आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड आणि तळेगाव परिसराला ‘मेक इन इंडिया’मुळे प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. या ठिकाणी पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यावर पेट्रोलिंगसाठी वाहने तसेच अतिरिक्त मनुष्यबळ मिळेल. पण, त्याला काही कालावधी लागेल. अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्याकडे झालेल्या बैठकीत पुणे शहर आणि ग्रामीणसाठी मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता मिळालेली आहे, असे पाटील यांनी उद्योजकांना सांगितले.
राज्यातील उद्योग व्यवसायला चालना देण्यासाठी तेथील कायदा-सुव्यवस्था तसेच उद्योजकांच्या अडचणींसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत ‘एमआयडीसी’बाबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस स्वतःहून उद्योग-व्यवसायाच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत.
त्यांचा वेळीच बंदोबस्त करा...
‘कंपनीत कंत्राट मिळविण्यासाठी, कच्चामाल, पाणी व इतर गोष्टी अमूक व्यक्तीकडूनच घ्या, असे कोणी धमकावत असेल तर त्यांचा वेळीच बंदोबस्त करा,’ असे आदेश सर्व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. ‘प्रत्येक जिल्ह्यातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या किमान ५०० जणांना निवडणुकीपूर्वी तडीपार करण्यात येणार आहे. कंत्राटदारांचा बुरखा पांघरून जर कोणी दादागिरी करीत असेल तर त्यांची वेळीच तक्रार करा,’ असे आवाहन नांगरेपाटील यांनी या वेळी उपस्थितांना केले.