अ‍ॅपशहर

महापालिकेला नियमावलीचा विसर

महापालिकेने स्वतःच तयार केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या नियमावलीचा महापालिकेलाच विसर पडला आहे. सध्याची कामे नियमावली धुडकावून अशास्त्रीय पद्धतीने सुरू आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 6 Jun 2021, 1:40 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणेः'महापालिकेने स्वतःच तयार केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या नियमावलीचा महापालिकेलाच विसर पडला आहे. सध्याची कामे नियमावली धुडकावून अशास्त्रीय पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते पुन्हा उखडले जाण्याची भीती आहे,' असा दावा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune municipal corporation forgets the rules
महापालिकेला नियमावलीचा विसर


वेलणकर यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन पाठवले आहे. महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावीत, यासाठी चार वर्षांपूर्वी तत्कालिन महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी निवृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने एक नियमावली तयार करून महापालिकेला सुपूर्द केली. वेलणकर या समितीचे सदस्य होते. सध्याची कामे पाहता महापालिकेला नियमावलीचाच विसर पडल्याचा दावा वेलणकर यांनी केला आहे.

'या कामाच्या ठिकाणी माहितीचा फलक नाही; तसेच बॅरिकेडिंगही केलेले नाही. थोडा भाग न खोदता संपूर्ण रस्ता खोदला असून, शेजारील रस्तेही खोदले आहेत. १५ ते २० मे पर्यंत रस्ता दुरुस्तीची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही अनेक रस्ते खणले जात आहेत. खोदकामाची माती रस्त्यावर पसरली असून पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे घाईघाईने अशास्त्रीय पद्धतीने रस्ते दुरुस्तीची कामे होत आहेत,' असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

नियमावलीचे पालन न झाल्यास रस्ते दुरुस्ती निकामी ठरेल. पुन्हा एकदा नागरिकांच्या करातून मिळालेले पैसे दुरुस्तीसाठी खर्ची पडतील. त्यामुळे ही कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचे आदेश द्यावेत. पावसाळ्यात कामे उखडली गेल्यास त्याच्या दुरुस्तीचा खर्च संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावा, असे वेलणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, 'मध्यवस्तीत नव्या वाहिन्या टाकण्याचे काम अनेक वर्षांनी केले जात आहे. हे काम प्रामुख्याने लॉकडाउन काळात करण्याचा प्रयत्न होता. खोदकाम झाल्यानंतर सध्या पावसात केले जाणारे डांबरीकरण तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. दहा जूनपर्यंत डागडुजीची सर्व कामे पूर्ण होतील,' असे पथविभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज