अ‍ॅपशहर

पालकमंत्री होताच चंद्रकांतदादांचा अजित पवारांना धक्का, ८६५ कोटींच्या कामांमध्ये फेरबदल?

Maharashtra Politics | जिल्ह्यात दौंड, मावळ वगळता भाजपचा आमदार अद्याप नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. ते कमी करण्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढविण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या १४ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक दिवस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 2 Oct 2022, 7:22 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे: महाविकास आघाडी सरकारमधील पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून ८६५ कोटी रुपयांच्या कामांमध्ये फेरबदल होण्याचे संकेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. 'डीपीसी'च्या कामांची यादी देण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chandrakant Patil Ajit Pawar (1)
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार


पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची बैठक 'सर्किट हाउस'ला शनिवारी घेतली. त्या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, वासुदेव काळे, प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, दिलीप खैरे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांच्या तक्रारी, गाऱ्हाणी पाटील यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

'जिल्हा नियोजन समितीच्या कामाच्या यादीत काही कामे असल्यास ती कार्यकर्त्यांनी जरूर सुचवावी. ठरावीक कामासाठी निधी शिल्लक असल्यास अतिरिक्त निधी देऊ. शिल्लक निधीतून कार्यकर्त्यांनी सुचविलेली कामे करण्यात येतील,' असे सांगून पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या कामांची यादी बदलण्याचे संकेत दिले आहेत. 'आगामी काळ निवडणुकांचा आहे. त्यामुळे भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती घेऊन जनतेपर्यंत जा. जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा सध्या सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल,' असेही आश्वासन द्यायला ते विसरले नाहीत. जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

समित्यांचा ७०:३० टक्के फॉर्म्युला

जिल्हास्तर; तसेच तालुका स्तरावर असलेल्या सरकारी समित्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या समित्यांच्या नियुक्तीसह जिल्हा नियोजन समितीवर सररकार नियुक्त सदस्यांसाठी नावे सुचविण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री आहे, त्या ठिकाणच्या समित्यांमध्ये ७० टक्के भाजपचे, तर ३० शिंदे गटाच्या सदस्यांचा समावेश असेल. जेथे भाजपचा आमदार आहे, तेथेही असाच फॉर्म्युला असेल. जेथे भाजप-शिंदे गटाचा आमदार नाही, त्या तालुक्यांमध्ये ५०:५० टक्के असा समित्यांच्या सदस्यांसाठीचा फॉर्म्युला असेल, अशी चर्चा या वेळी बैठकीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चंद्रकांत पाटील म्हणाले...

- सत्कार समारंभ नको. पुष्पगुच्छ देऊ नका.

- फटाके वाजविणार असाल, तर मी निघून जाईन.

- परिसरात कार्यकर्त्यांनी स्वच्छता ठेवावी.

- सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्या शक्य नाहीत.

प्रत्येक तालुक्यात एक दिवस

जिल्ह्यात दौंड, मावळ वगळता भाजपचा आमदार अद्याप नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. ते कमी करण्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढविण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या १४ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला एक दिवस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात एका दिवसात कार्यकर्त्यांची; तसेच अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तेथील समस्या, विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. येत्या १४ ऑक्टोबरला जुन्नर, खेड तालुक्यापासून या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज