अ‍ॅपशहर

पकडले फसवणुकीचे ‘कॉल’

सरकारी बँकेतील खात्यावर ११ हजार रुपये भरल्यानंतर १५ हजार रुपये मिळतील...एक लाख रुपये भरल्यास पाच लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून शहरातील पन्नास गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना गंडा घालणारे इंदूरमधील (मध्य प्रदेश) कॉलसेंटर सायबर सेलने उद्धवस्त केले आहे. फसवणूक करणाऱ्या या कॉलसेंटरमध्ये (बीपीओ) दीडशेहून अधिक कर्मचारी नोकरीस होते. येथून कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक, सांगली आणि नागपूर येथील गुंतवणूकदारांना टोप्या घातल्याचे उघड झाले आहे.

Maharashtra Times 21 Oct 2016, 4:10 am
इंदूरमधील कॉलसेंटरवर सायबर सेलचा छापा; तिघे ठकसेन ताब्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune police cyber branch detains fraud in indoor
पकडले फसवणुकीचे ‘कॉल’


म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी बँकेतील खात्यावर ११ हजार रुपये भरल्यानंतर १५ हजार रुपये मिळतील...एक लाख रुपये भरल्यास पाच लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून शहरातील पन्नास गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना गंडा घालणारे इंदूरमधील (मध्य प्रदेश) कॉलसेंटर सायबर सेलने उद्धवस्त केले आहे. फसवणूक करणाऱ्या या कॉलसेंटरमध्ये (बीपीओ) दीडशेहून अधिक कर्मचारी नोकरीस होते. येथून कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक, सांगली आणि नागपूर येथील गुंतवणूकदारांना टोप्या घातल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी तिरुमूर्ती पूम नाडर (वय ७०, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नाडर यांचे शेअरकम कंपनीमध्ये डीमॅट खाते होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अनोळखी मोबाइल तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार रुपये भरल्यास तीन दिवसांमध्ये १५ हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष नाडर यांना दाखविण्यात आले. त्याप्रमाणे नाडर यांनी ११ ऑगस्ट रोजी संबंधित खात्यात पैसे भरले. त्यानंतर लगेचच त्यांना आरोपींकडून फोन आले. त्याच खात्यावर एक लाख रुपये भरल्यास पाच लाख रुपये मिळतील, असा दावा करण्यात आला. याही आमिषाला बळी पडून नाडर यांनी पैसे भरले.
दूरध्वनीवर नमूद केल्याप्रमाणे नाडर यांना भरलेल्या रकमेचा परतावा काही मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी आलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्यास सुरुवात करून भरलेले पैसे परत मागितले. मात्र, आरोपींनी त्यांचा फोन उचलणेच बंद केले. त्यानंतर नाडर यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास फौजदार नितीन खामगळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. खामगळ तपास पथकासमवेत इंदूर येथे गेले होते. त्यांनी रिपल अॅडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेड, विजयनगर येथील कॉलसेंटरमध्ये तपास केला. या ठिकाणी दीडशे जण नोकरीस होते. नाडर यांना फसवणारे मनीष जैन (वय २७, रा. इंदूर), राजेश सिंग अनुपसिंग राठोड (वय ३६, रा. अभिनंदनगर, इंदूर) आणि राजेशसिंग श्रीरामसिंग रजपूत (वय ३२, रा. इंदूर) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाइल, डायलर, कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. आरोपींच्या प्राथमिक चौकशीत त्यांनी कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक, सोलापूर आणि नागपूर येथील ५० गुंतवणूकदारांना फसविल्याची कबुली दिली आहे. आरोपींना अटक करून विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीता मिसाळ, प्रवीण स्वामी, कर्मचारी संतोष जाधव, अस्लम आतार, राजू भिसे, किरण अब्दागिरे, अमित औचरे, आदेश चलवादी, नितीन चांदणे, योगेश वाव्हळ आणि शिरीष गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
..
‘सायबर सेलशी संपर्क साधा’
नागरिकांनी अशाप्रकारचे फसवे कॉल, एसएमएस तसेच ई-मेलना बळी पडू नये असे आवाहन पवार यांनी केले आहे. अशाप्रकारे कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर सेलकडे संपर्क साधावा असे आवाहनही पवार यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज